Friday 23 May, 2008

विजय तेंडुलकर

विजय तेंडुलकर यांचे अल्पचरित्रविजय तेंडुलकरांचा जन्म सहा जानेवारी १९२८ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील धोंडोपंत हे स्वतः लेखक, प्रकाशक आणि हौशी नट होते. त्यांच्याकडून प्रारंभीचे संस्कार तेंडुलकरांना मिळाले. तसेच दि. बा. मोकाशी, वि. वि. बोकील, अनंत काणेकर, शिवरामपंत वाशीकर यांच्या लेखनातूनही काही संस्कार झाले.मनस्वी नाटककार - विजय तेंडुलकरांचा जन्म सहा जानेवारी १९२८ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील धोंडोपंत हे स्वतः लेखक, प्रकाशक आणि हौशी नट होते. त्यांच्याकडून प्रारंभीचे संस्कार तेंडुलकरांना मिळाले. तसेच दि. बा. मोकाशी, वि. वि. बोकील, अनंत काणेकर, शिवरामपंत वाशीकर यांच्या लेखनातूनही काही संस्कार झाले. तेंडुलकरांचे औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सहभाग होता. साहजिकच विविध विचारसरणींशी त्यांचा जवळून परिचय झाला. पुणे आणि मुंबईत त्यांचा बराचसा काळ व्यतीत झाला; पण हे दिवस अस्थिरतेचे होते. १९६६ नंतर मात्र ते मुं बईतच राहिले आणि तीच त्यांची कर्मभूमी बनली. १९५५ पासूनच त्यांची लेखणी तळपू लागली होती. चरितार्थासाठी प्रारंभी त्यांनी वृत्तपत्रव्यवसाय स्वीकारला. "नवभारत', "मराठा', "लोकसत्ता', "नवयुग', "वसुधा' आदी वृत्तपत्रे आणि नियतकालिकांतून त्यांनी संपादन आणि सदरलेखनाचे काम केले. १९४८ मध्ये "आमच्यावर प्रेम कोण करणार' ही त्यांची पहिली कथा प्रकाशित झाली. "रात्र' ही त्यांची अतिशय गाजलेली एकांकिका! १९५० नंतर अस्तित्वात आलेल्या मराठी नाटककारांच्या नव्या पिढीच्या अग्रभागी विजय तेंडुलकर यांची लेखनमुद्रा स्वतःच्या खास बाजाने तळपत राहिली. १९५१-५२ च्या सुमारास भारतीय विद्याभवनने नव्याने सुरू केलेल्या एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने तेंडुलकरांचे नाट्यलेखन सुरू झाले. नभोवाणीसाठीही त्यांनी नाट्यलेखन केले. त्यांनी आरंभीच्या काळात निवडलेले विषय कौटुंबिक स्वरूपाचे आणि मध्यमवर्गीय जीवनाशी संबंधित होते. लेखनदृष्ट्या "गृहस्थ' हे तेंडुलकरांचे पहिले नाटक. (याचेच "कावळ्यांची शाळा' या नावाने त्यांनी १९६४ मध्ये पुनर्लेखन केले) मात्र "श्रीमंत' हे त्यांचे रंगभूमीवरील पहिले नाटक! तेव्हापासूनच माणसाच्या जीवनाचा, त्यांच्या विकारांचा, एकारलेपणाचा वेध घेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. विशिष्ट तत्त्वज्ञानाचा, विचारसरणीचा ठसा नाकारून "तें' मनस्वीपणे लिहीत गेले. "शांतता कोर्ट चालू आहे' यासारख्या नाटकातून समाजाला प्रसंगी बंडखोर वाटणाऱ्या विषयांनाही त्यांच्या प्रयोगशील आणि संवेदनशील लेखणीने हात घातला. "सखाराम बाईंडर'मध्ये हाताळलेला स्फोटक विषय आणि "घाशीरा म'मध्ये हाताळलेला पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध त्यांच्या याच प्रयोगशील जाणिवांचा अविभाज्य भाग होता. त्यामुळेच नव्या- जुन्या कलावंतांना तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकांचे आव्हान पेलण्याची ओढ सातत्याने राहिली. "माणूस नावाचे बेट', "मधल्या भिंती', "सरी गं सरी', "एक हट्टी मुलगी', "अशी पाखरे येती', "गिधाडे', "छिन्न' आदी नाटके रूढ सामाजिक संकेतांना, तसेच नाट्यसंकेतांना हादरा देणारी आणि वादग्रस्त ठरली. मानवी वृत्तीतील कुरूपता, हिंस्रता यांचे भेदक, पण वास्तववादी उग्रकठोर चित्रण असल्याने या नाट्यकृती गाजल्या. त्यावर वाद झडले आणि न्यायालयीन स ंघर्षही झाला. आशय आणि तंत्रदृष्ट्या असणारी विलक्षण विविधता, हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले. नाटकांबरोबरच लघुकथा, ललित साहित्यातही सामाजिक समस्यांमुळे अस्वस्थ आणि हळुवार बनलेला "तें'मधला लेखक वाचकांना भावला. चित्रपट माध्यमही त्यांनी तितक्‍याच ताकदीने हाताळले. "सामना', "सिंहासन', "आक्रीत', "उंबरठा', "अर्धसत्य', "आक्रोश', "आघात' आदी चित्रपटांच्या पटकथांवर खास तेंडुलकरी ठसा होता. "स्वयंसिद्धा' या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखनही त्यांनी केले. मानवी मनाचे, त्यातही त्याच्या कुरूपतेचे चित्रण करून अशा व्यक्तिरेखांना समजून घेण्यात, त्यांचे जीवन मांडताना घडते-बिघडते संबंध, त्यातील ताण, त्या अनुषंगाने व्यवस्थांचे बंदिस्तपण टिपण्यात त्यांची लेखणी रमते, काव्य-कारुण्य, व्यक्ती- समाज, वास्तव-फॅन्टसी यांची कलात्मक सरमिसळ त्यांच्या नाटकांत आढळते. नवनाट्य, वास्तववाद यांच्याशी त्यांच्या लेखनाचे आंतरिक नाते दिसते. तरीही त्यांच्यावर कोणताही शिक्का मारता येत नाही इतकी प्रयोगशीलता दिसते. "देशातील वाढता हिंसाचार' या विषयाच्या अभ्यासासाठी त्यांना १९७३-७४ मध्ये नेहरू शिष्यवृत्ती मिळाली होती. तसेच १९७९ ते ८१ दरम्यान त्यांनी "टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस' या संस्थेत अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही काम केले. नवनाट्याविषयी आस्था बाळगणाऱ्या संस्था आणि त्यातील कार्यकर्त्यांशी त्यांचा जिव्हाळा होता. "जनस्थाना'चा मानकरी - कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या "जनस्थान पुरस्कारा'चे तेंडुलकर पहिले मानकरी होते. १९७० मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, त्याच वर्षी कमलादेवी चट्टोपाध्याय पुरस्कार, १९७७ मध्ये "मंथन'साठी सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १९८१ मध्ये "आक्रोश' चित्रपटासाठी "फिल्म फेअर'चा सर्वोत्कृष्ट कथा व पटकथा पुरस्कार; तर १९८३ मध्ये "अर्धसत्य'साठी पुन्हा सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी "फिल्म फेअर' पुरस्कार त्यांना मिळाला. "पद्मभूषण', "महाराष्ट्र गौरव', "सरस्वती सन्मान', मध्य प्रदेश सरकारचा "कालिदास सन्मान', विष्णुदास भावे गौरवपदक, कथा चूडामणी पुरस्कार, पु. ल. देशपांडे बहुरूपी सन्मान, तन्वीर सन्मान आदी इतर पुरस्कारही त्यांना मिळाले. १९९८ मध्ये संगीत नाटक अकादमीची अभ्यासवृत्तीही त्यांना मिळाली होती. "तें'च्या लेखनाबरोबरच त्यांच्या मुलाखतीही तितक्‍याच गाजल्या. त्यातून अनेक वादविवादही झडले. त्यांचा स्वभावच वादळे अंगावर घेण्याचा. त्यातूनच "हजारो लोकांचे आयुष्य उद्‌ध्वस्त करणारी माणसे आज समाजात आहेत. त्यांचे मारेकरी होण्यास मला आवडेल,' असे जळजळीत उद्‌गारही बाहेर पडले. पुरस्कार स्वीकारताना जाहीर व्यासपीठावरून "आमच्या पिढीने स्वतःलाच फसवले,' अशी खंतही तितक्‍याच सहजपणे व्यक्त झाली. साहित्य निर्मिती, नाटके व एकांकिका - गृहस्थ, श्रीमंत, गिधाडे, सखाराम बाईंडर, घाशीराम कोतवाल, शांतता कोर्ट चालू आहे, अशी पाखरे येती, कन्यादान, मधल्या भिंती, चिमणीचं घर होतं मेणाचं, छिन्न, माणूस नावाचे बेट, कावळ्याची शाळा, अजगर आणि गंधर्व, एक हट्टी मुलगी, भेकड, मी जिंकलो मी हरलो, सरी गं सरी, झाला अनंत हनुमंत, घरटे अमुचे छान, द्वंबदीपाचा मुकाबला, भल्या काका, भाऊ मुरारराव, बेबी, पाहिजे, कमला, मादी (हिंदी), मित्राची गोष्ट, देवाची माणसे. एकांकिका - रात्र आणि इतर एकांकिका, अजगर आणि गंधर्व, थीफ ः पोलिस. बालनाट्ये - इथे बाळे मिळतात, पाटलाच्या पोरीचे लगीन, चिमणा बांधतो बंगला, चांभारचौकशीचे नाटक, मुलांसाठी तीन नाटिका. चित्रपट पटकथा - सामना, सिंहासन, उंबरठा, चिमणराव, शांतता कोर्ट चालू आहे, घाशीराम कोतवाल, आक्रीत, अर्धसत्य, २२ जून १८९७, प्रार्थना, निशांत, मंथन, आक्रोश, कमला, गहराई, ये है चक्कड बक्कड बूम्बे बू. मालिका - स्वयंसिद्धा. टॉक शो - प्रिया तेंडुलकर टॉक शो. नाट्यविषयक लेखन - नाटक आणि मी. ललित - कोवळी उन्हे, रातराणी, फुगे साबणाचे, रामप्रहर. कथा - काचपात्रे, गाणे, फुलपाखरू, द्वंद्व, मेषपात्रे. संपादने - दिवाकरांच्या नाट्यछटा, समाजवेध. भाषांतरे ः वासनाचक्र (टेनेसी विल्यम्सच्या "स्ट्रीटकार नेम्ड्‌ डिझायर'चे भाषांतर), "लोभ असावा ही विनंती' (जॉन मार्क पॅट्रिकच्या "हेस्टी हार्ट'चे भाषांतर), "आधेअधुरे' (मोहन राकेश), "तुघलक' (गिरीश कर्नाड), चित्त्याच्या मागावर. विविध लेखन - लिंकन यांचे अखेरचे दिवस. कादंबरी - कादंबरी एक आणि दोन. माहितीपट - तेंडुलकर आणि हिंसा (अतुल पेठे).

No comments: