Thursday, 7 April 2011

अण्णांचे आंदोलन, मीडिया आणि काही मूलभूत प्रश्न...


ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नवी दिल्लीत जंतरमंतरवर बेमुदत उपोषण सुरू केलंय. बहुप्रतिक्षित लोकपाल विधेयक संमत व्हावं, यासाठी अण्णांनी उपोषणाचं हत्यार उपसलंय. या आंदोलनात अण्णांना देशभरातून सर्वच स्तरांतून वाढता पाठिंबा मिळतोय. भ्रष्टाचारमुक्त देशाच्या निर्मितीसाठी लोकपाल विधेयक अत्यंत आवश्यक आहे. ते मंजूर होऊन भ्रष्टाचाराला आळा बसावा, हा शुद्ध हेतू अण्णांच्या आंदोलनाचा नक्कीच आहे. अण्णा उपोषणाला बसल्यापासून देशभरातली सगळी प्रसारमाध्यमं विशेषतः सगळ्या चोवीस तास वृत्तवाहिन्या याच विषयाच्या बातम्या सातत्यानं दाखवत आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांतल्या वाहिन्यांनी अण्णांच्या आंदोलनाची बातमी सातत्यानं लावून धरलीय. बहुतेक वाहिन्या जंतरमंतरवरून आंदोलनाचे लाईव्ह दाखवत आहेत. काही वाहिन्यांनी तर अण्णा के अनशन के अमुक अमुक घंटे असं सतत टीव्ही स्क्रीनवर सुरूच ठेवलंय. वर्ल्ड कप होता तेव्हा मॅचचा स्कोअर दाखवायचे तसं या वाहिन्या अण्णा के अनशन के अमुक अमुक घंटे असं चालवतायत. तर काही वाहिन्यांनी अण्णांचं मेडिकल अपडेटही द्यायला सुरूवात केलीय. म्हणजे अमुक अमुक वाजता अण्णांचा बीपी किती होता... वगैरे वगैरे.... हे कमी म्हणून की काय, बहुतेक सगळ्या चोवीस तास वाहिन्यांवर अण्णा हजारेंच्या आंदोलनाबाबत अखंड चर्चाचर्वण सुरू आहे. समाजातले सगळे विचारवंत विश्लेषक वेगवेगळ्या वाहिन्यांच्या टॉक शोजमध्ये आपापली मतं मांडतायत. देशभरात सध्या फक्त एक आणि एकच चर्चेचा विषय आहे आणि तो म्हणजे अण्णांचे आंदोलन...!

आता हे सगळं पाहत असताना प्रसारमाध्यमांच्या अनुषंगाने मनात काही प्रश्न निर्माण झाले. अण्णांनी आंदोलनाचा मुहूर्त निवडला तो पाच एप्रिलचा.... म्हणजे वर्ल्ड कप संपून तीन दिवस उलटून गेलेले आणि आयपीएल सुरू व्हायला तीन दिवस शिल्लक... वर्ल्ड कप भारतानं जिंकला दोन एप्रिलला... त्यानंतर जवळपास दोन दिवस धोणी धुरंधरांच्या सुरस यशोगाथा गाण्यात सगळा मीडिया बिझी होता. त्यातच सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार दिला जावा, अशी मागणी सगळ्याच स्तरातून होऊ लागली. त्याचीही चर्चा मीडियावर बरीच रंगली.. क्रिकेटचा हा हँगओव्हर उतरत असतानाच अण्णांचं आंदोलन सुरू झालं आणि आख्खा मीडिया त्यावर अधाशासारखा तुटून पडला. कारण वर्ल्ड कप संपल्यानंतर मीडियाकडे चघळायला विषय तरी कुठे होता...? अण्णांच्या आंदोलनाविषयी खरंच किती पोटतिडकीनं सगळ्या वाहिन्या वार्तांकन करतायत हा कळीचा आणि चर्चेचा मुद्दा आहे. मीडियाची अण्णांच्या आंदोलनाविषयी असलेली बांधिलकी किती खरी आणि किती खोटी हे आयपीएल सुरू झालं की लगेचच समोर येईल. कारण एकदा का आयपीएल सुरू झालं की त्याच्याच बातम्या सुरू होतील आणि लोकपाल विधेयकाचा झेंडा घेऊन मैदानात उतरलेल्या अण्णांच्या बातम्या कुठल्या कुठे मागे पडतील... बरं आणि या वाहिन्या अण्णांच्या आंदोलनाचं जे वार्तांकन करतायत तेही फार मजेशीर आहे. यात कुठेही अण्णांनी मांडलेला मूळ मु्द्दा माध्यमांनी ( काही सन्माननीय अपवाद वगळता ) मांडलेला नाही. लोकपाल विधेयक नेमकं आहे काय, त्यातल्या तरतुदी काय आहेत, हे विधेयक गेली ४२ वर्षं प्रलंबित का आहे, त्याची कारणं काय आहेत, यावर कुठेही फोकस केलेला दिसला नाही... दिसलं ते फक्त 'अण्णांच्या वादळापुढे सरकार नमले', 'मनमोहनसिंग सरकार अण्णांच्या प्रश्नांपुढे निरुत्तर', 'पवारांनी मंत्रिगटाचा दिला राजीनामा', 'सोनियांनी अण्णांना केली विनंती'... वगैरे, वगैरे.... आणि अण्णांच्या आंदोलनाला सेलिब्रेटींनी दिलेला पाठिंबा... आमीर खान, मधुर भांडारकर, दिया मिर्झा, रझा मुराद, अनुपम खेर यासारखी बॉलिवूडमधली मंडळी अण्णांच्या पाठिशी उभी राहिली. त्यामुळे या आंदोलनाला ग्लॅमर मिळालं. वाहिन्यांनी नेमकं तेच टिपलं... शेवटी प्रश्न टीआरपीचाही आहे. फक्त अण्णा हजारे चोवीस तास दाखवून वाहिन्यांना हवा तसा टीआरपी मिळेल ? हां... या सगळ्यांत एक जमेची बाजू नक्कीच आहे आणि ती म्हणजे मीडियाच्या अशा प्रकारच्या कव्हरेजमुळे अण्णा हजारे खऱ्या अर्थानं 'नॅशनल फिगर' झाले...!

दुसरा मुद्दा... फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साईटसवर अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे ग्रुप तयार होऊ लागलेयत. अण्णांना पाठिंबा व्यक्त करणारे मजकूर लिहिले जाऊ लागलेयत. पण, हे सगळं एखादी लागण व्हावं तसं आहे असं मला वाटतं. एखाद्यानं लिहिलं आणि त्याला फेसबुक वॉलवर लाईक केलं किंवा त्यावर कमेन्ट टाकली म्हणजे आपण अण्णांच्या कार्याला हातभार लावला असं अनेकांना वाटू शकतं. हा धोका यात आहे. फक्त फेसबुक वॉलवर लिहून अण्णांचा हेतू साध्य होणार नाही हे सुज्ञ नेटिझन्सनी ध्यानात घ्यायला हवं. अण्णांनी सुरू केलेली ही लढाई म्हणजे फक्त सुरुवात आहे.... जोपर्यंत लोकपाल विधेयक संमत होत नाही, भ्रष्टाचाराला आळा घातला जात नाही तोपर्यंत ही लढाई फलद्रूप होऊ शकणार नाही. मीडियानंही हे लक्षात घ्यायला हवं... उगंच, पळा रे पळा रे.. लाईव्ह करा रे करा रे... बाईट घ्या रे घ्या रे... असं नुसतं पळापळ करून चालणार नाही. लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण आहोत, हे लक्षात घेऊन तो अधिक बळकट कसा होईल, हे पाहायला हवे.
- दुर्गेश सोनार  

Sunday, 10 October 2010

9 ऑक्टोबरच्या निमित्ताने

9 ऑक्टोबर... तसा इतर दिवसांसारखाच हाही एक दिवस.... पण, या दिवसाचं माझ्या लेखी फार वेगळं मोल आहे... कारण दुर्गेश दिगंबर सोनार या व्यक्तिमत्त्वाचा जन्म याच दिवशी झाला. पंढरपूर सारख्या छोट्या शहरात नवरात्रातल्या आठव्या माळेला म्हणजेच दुर्गाष्टमीला रात्री सव्वा अकरा - साडे अकराच्या सुमाराला माझा जन्म झाला. आता या गोष्टीला काल म्हणजे 9 ऑक्टोबरला 32 वर्षं पूर्ण झाली. आयुष्यातली ही एवढी वर्षं सरल्याची जाणीव होत असतानाच आता किती वर्षं उरलीयत याचीही एक गडद जाणीव मनात घोळतेय....

दिवसभरांत अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, एसएमएस केले, फोन केले, फेसबुक आणि ऑर्कुटवरही शुभेच्छा व्यक्त केल्या. ऑफिसमध्येही सहकाऱ्यांनी केक आणला.... हे सगळं करत असताना मी माझ्या बालपणात हरवून गेलो...  मला आठवतं... आम्ही शाळेत असताना आई बाबा आमच्या प्रत्येकाचा वाढदिवस मोठ्या हौसेने करायचे.. आमच्या शाळेतल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना आवर्जून घरी बोलवायचे... त्यावेळेसचा मेनूही तसा ठरलेलाच असायचा... गोड पदार्थ म्हणून गुलामजामुन किंवा मला आवडतात म्हणून बेसन लाडू... पंढरपूरचे चिरमुरेही प्रसिद्ध... त्यामुळे आईने केलेला खमंग चिवडाही असायचा... कधी कधी आमच्या हट्टाखातर आई इडली सांबरही करायची...  बालपणी वाढदिवस म्हणजे खूप आनंदाचा दिवस असायचा... नवे कपडे घालायचे... मित्रमैत्रिणींसोबत आईने केलेला खाऊ खायचा... भेटवस्तू स्वीकारायच्या... खेळ खेळायचे.... असं बरंच काही.... या सगळ्यामध्ये आपलं वय वाढतंय याची जाणीव त्या काळात फारशी व्हायची नाही... ती जाणीव हळूहळू व्हायला लागली आणि माझा वाढदिवसाकडे बघण्याचा दृष्टीकोन आपोआपच बदलला.

आता वाढदिवसाचे फारसे अप्रूप वाटत नाही. उलट आयुष्यातलं एक वर्षं संपल्याचं जाणवत राहतं... आता जी काही वर्षं उरली असतील, त्यामध्ये बरंच काही साध्य करायचं आहे... त्यासाठी करावी लागणारी मेहनत, त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न... याची मला मनापासून जाणीव आहे. आजवरच्या आयुष्यात मला खूप काही मिळालंय... सुप्रियासारखी समजूतदार आयुष्याची जोडीदार आणि आमच्या संसारवेलीवर शताक्षीच्या रुपानं फुललेलं गोंडस फूल... दिवस कितीही कामात गेला, कितीही तणावाखाली गेला... तरी रात्री घरी आल्यानंतर शताक्षीचे बा बा बा बा असे बोबडे बोल ऐकले की सारं काही विसरून जातं... मन अगदी मोकळं मोकळं होऊन जातं... तिच्या दिवसेंदिवस प्रगल्भ होत जाणाऱ्या बाललीला... आपलं बालपण पुन्हा आपल्यासमोर येतं ते असं... तिचं असं वाढणं.... मी पाहत राहतो.... आता तिचेच वाढदिवस....

- दुर्गेश सोनार ( 10 ऑक्टोबर 2010 )

Tuesday, 6 April 2010

संमेलनाच्या मांडवकळा...

पुण्यनगरीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊन आता दहा एक दिवस उलटून गेले आहेत. पण, मोरोपंतांच्या मनात अजूनही या संमेलनाच्या मांडवकळा सुरूच आहेत. अमिताभच्या खास कमावलेल्या आवाजातलं मधुशाला ऐकताना मोरोपंतांचे कान तृप्त झाले होते. अवघं मराठी साहित्य विश्व या मधुशालेच्या एकाच प्यालात फेसाळताना मोरोपंतांनी याचि देही याचि डोळा अनुभवलं होतं. तसं तर मोरोपंतांना संमेलनाध्यक्ष डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्याविषयी विशेष आत्मीयता.... पण, समारोपाला बच्चन महोदयांच्या उपस्थितीमुळे साक्षात् दभि सुद्धा भांबावलेले* दिसले. (*मोरोपंतांना खरं तर भांबावलेले या शब्दाऐवजी भंजाळलेले हा शब्दप्रयोग अपेक्षित असावा, पण, मराठी समीक्षेत या शब्दाला प्रमाण भाषेचा दर्जा मिळाला आहे किंवा नाही या बद्दल त्यांच्या मनात साशंकता आहे.) संमेलनाचं फलित काय, त्यात चर्चिले गेलेले साहित्यविषयक मुद्दे यांचा अध्यक्ष या नात्याने दभिंनी साक्षेपी समारोप करणं अपेक्षित होतं. पण, झालं भलतंच... ते तर शरिरासारखीच अभिनयातही उंची गाठलेल्या अमिताभकडे पाहून भारावून गेले होते आणि आपण काय मुद्दे मांडतो आहोत, याचं भानच त्यांना उरलं नाही... त्यांच्या पंधरा वीस मिनिटांच्या भाषणातला बहुतांश भाग हा अमिताभजींचं कौतुक करण्यातच खर्ची पडला. आपल्या आवडत्या उत्तम समीक्षकाच्या अध्यक्षीय समारोपाची अशी समीक्षा करावी लागेल, याचा बहुत खेद मोरोपंतांना वाटत होता. तीच सल त्यांच्या मनात अजूनही बोचते आहे.


नाही म्हणायला संमेलन पुण्यप्रभावी ठरले हे खरंच आहे. काय नव्हतं बरं त्या संमेलनात... सगळं काही होतं... ज्ञानपीठ विजेते विंदा म्हणायचे तसं ‘तेच तें तेच तें…..’ नक्कीच होतं. म्हणजे बघा, तेच वाद, तेच विषय, तेच वक्ते... सारं कसं तेच तें... पुण्यनगरीतच जेव्हा पहिलं ग्रंथकारांचं संमेलन झालं तेव्हापासूनच खरं तर वादांची संगत संमेलनाशी जोडली गेली. एका अर्थी वाद हे साहित्य संमेलनाच्या पाचवीला पुजले गेलेयत. पण, त्या काळातले वाद हे शंभर टक्के साहित्यविषयक वाद असायचे... पण, आजकालचे वाद हे फुटकळ आणि क्षुल्लक असतात. पराचा कावळा करणे अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. त्याचंच प्रत्यंतर सध्याच्या काळात येत असल्यानं मोरोपंतांची साहित्यिक अस्वस्थता दिवसेंदिवस वाढतच चाललीय. आता, यंदाच्या संमेलनात वादाची बांग दिली सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी... व्यसनाने बरबटलेला पैसा संमेलनासाठी का वापरावा, असा खडा सवाल त्यांनी संमेलनाच्या स्मरणिका प्रकाशन समारंभात केला आणि तिथून वाद रंगत गेला. आता माणिकचंदशी संबंधित वाद आहे म्हटल्यावर तो रंगणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नसावी... साहित्यातले सगळे ‘उंचे लोग’ आपापली साहित्यिक ‘उंची पसंद’ घेऊन वादात उतरले. कशी गंमत आहे पहा... समारोपातही वादाची एक वेगळीच उंची बघायला मिळाली. याला म्हणतात संमेलन वेगळ्या उंचीवर जाणे... असो, विषय तत्वाचा होता. पण, संयोजकांनी कुठे स्वतःहून माणिकचंदचं प्रायोजकत्व नाकारलं ? दस्तुरखुद्द माणिकचंदवाल्यांनीच आपलं प्रायोजकत्व मागे घेतलं आणि वादावर पडदा टाकला.. पण, मोरोपंतांच्या मनात तरीही हा वाद कुठेतरी बाकी होताच... संमेलन सुरु झालं आणि रसिकांसाठी, निमंत्रितांसाठी जे पाणी दिलं जात होतं त्यावर तर चक्क माणिकचंदचाच ब्रँड होता... व्यसनांचा पैसा नको तर मग त्यांच्या ब्रँडचे पाणी तरी कशाला हवे, असा एक सहजप्रश्न मोरोपंतांना एकसारखा पडत होता.

संमेलन तर सुरू झालं... आणि त्याचबरोबर वादाचा नवा अंकही सुरू झाला. अमिताभ बच्चन समारोपाला येणार, त्याच्यासोबत मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार, हे संयोजक म्हणतात, तसं खूप आधी ठरलेलं.. पण, काँग्रेसच्या संस्कृतीला ते रुचलं नसावं... अमिताभची ऍलर्जी असलेल्या काँग्रेस श्रेष्ठींची नाराजी नको, म्हणून मुख्यमंत्र्यांनी शक्कल लढवली. त्यांनी संमेलनाला दुसऱ्याच दिवशी भेट दिली. अहो, पण, त्यामुळे नियोजित परिसंवादांचा बोऱ्या वाजला... माध्यमांनाही परिसंवादांपेक्षा ‘सीएम – बिग बी – काँग्रेस’ या वादातच स्वारस्य होतं... म्हणजे संमेलनाला साहित्यिक मूल्य म्हणून जेवढी प्रसिद्धी मिळायला हवी होती, त्याऐवजी असल्या फालतू वादांमुळेच अधिक प्रसिद्धी मिळालेली पाहून मोरोपंत अक्षरशः हलबलले....

असं म्हणतात वय वाढत जातं तसं माणूस अनुभवानं परिपक्व होत जातो... इथे तर साहित्य संमेलनाला शंभर वर्षांची परंपरा आहे. आता जे झालं ते संमेलन तर 83 वं होतं... म्हणजे, वय वाढत चाललेल्या साहित्य संमेलनांमध्येही पक्वता यायला हवी... पण, प्रत्यक्षात ही संमेलनं जख्ख म्हातारी होत चाललीयत, त्यांना कसलाही साहित्यिक बैठकीचा आधार नाही... राजकीय आणि पैसेवाल्यांच्या बेगडी दिखाऊपणाचं ओझं घेऊन संमेलनं वाकत चाललीयत... मोरोपंतांसारखा खरा रसिक संमेलनाची ही साहित्यिक विटंबना पाहून धास्तावला आहे...

- दुर्गेश सोनार ( 7 एप्रिल 2010)

Friday, 19 February 2010

शिक्षणाच्या ...... घो !

शाळेची घंटा झाली. वर्ग भरले. नवं शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतरचा शाळेचा पहिलाच दिवस. सातवीतल्या वर्गात गटणे मास्तर हजेरीबुक घेऊन घुसले. सुस्मित वदनानं मास्तरांनी मुलांकडे पाहिलं. मुलांनीही ‘गुड मॉर्निंग सर...’ असं उच्चरवात मास्तरांचं स्वागत केलं. मास्तरांनी मग एकेका मुलाला त्यांचं नाव विचारायला सुरवात केली. एकेक करता करता त्यांनी एका मुलाला विचारलं, ‘व्हॉट इज युवर नेम ?’ त्यावर तो तप्तरतेनं उत्तरला, ‘माय नेम इज खान !’ असेल बुवा त्याचं नाव असं म्हणत मास्तरांनी पुढच्या मुलाकडे मोर्चा वळवला. त्याला त्याचं नाव विचारलं, तर तो खर्ज लावून म्हणाला, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय...!’ अरे देवा, हा काय प्रकार असं म्हणत मास्तर एकदम बुचकळ्यात पडले. तितक्यात एक जण हातात झेंडा घेऊन उभा राहिला आणि मास्तरांना विचारू लागला, ‘आपली माणसं आपलीच माती, तरी मेंढराची कळपास भीती... या कवितेचा अर्थ काय ?’ मास्तर आणखीच गोंधळले. मराठीच्या अभ्यासक्रमात तर ही कविता कुठेच नाही आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांना कवितेचा प्रश्न कसा काय पडावा, याचं मास्तरांना आश्चर्यच वाटलं. वेळ मारून नेण्यासाठी ते म्हणाले, ‘मुलांनो, आज तर पहिलाच दिवस आहे शाळेचा, यथावकाश आपण शिकणारच आहोत नां...!’ आता खडू घेऊन मास्तर फळ्याकडे वळले. बघतात तर काय, फळ्यावर मोठ्या अक्षरांत आधीच लिहून ठेवलेलं, ‘ब्रेकिंग न्यूज...!’ आता बोंबला... ‘हा काय प्रकार आहे ?’ मास्तरांनी त्रासिकपणे मुलांना विचारलं. मुलं एका सुरांत उत्तरली, आमच्या घरांत टीव्हीवर सतत सुरु असते ती ब्रेकिंग न्यूज... शाळेत तुम्ही जे शिकवता, त्याहीपेक्षा कितीतरी रंजक आणि सुरस गोष्टी आम्हाला ब्रेकिंग न्यूज मधूनच शिकायला मिळतात. आम्हाला तुमचं नेहमीचं पुस्तकबंद शिक्षण नकोय, आम्हाला असंच ब्रेकिंग न्यूजवालं चटपटीत, खुसखुशीत रंजक शिक्षण हवंय... म्हणजे बघा, युवराज राहुल गांधी मुंबईत आले. त्यांना शिवसेना काळे झेंडे दाखवणार होती. पण, राहुल भलतेच हुशार निघाले. त्यांनी थेट लोकल गाठली. तिकिटाला पैसे हवे म्हणून एटीएममधनं पैसे काढले. आता हे सगळे एवढे नाट्यमय थ्रिलर प्रकार आम्हाला कसे कळले, सांगा बरं मास्तर..? अहो, चोवीस तास चालणाऱ्या ब्रेकिंग न्यूजमधनंच तर आम्हाला ही अत्यंत उद् बोधक माहिती मिळाली. अहो, टीव्ही हे ज्ञानार्जनाचे उत्तम साधन आहे, हे काय उगाच थोरामोठ्यांनी लिहून ठेवलंय ? ....


मुलांच्या या भडिमारामुळे गटणे मास्तर अधिकच चक्रावले. शाळेच्या पहिल्याच दिवशी पहिल्याच तासाला मुलांचे हे असे प्रश्न... म्हणजे माय नेम इज खानच्या फर्स्ट डे फर्स्ट शोला शिवसैनिकांनी केलेला गोंधळच... अशी भावना मास्तरांची झाली. अरे हे काय आपल्यालाही सिनेमाचीच उपमा कशी काय आठवावी ? गटणे मास्तर आणखीनच कोड्यात पडले. क्षणभर डोळे मिटून घेतल्यावर त्यांना लक्षात आलं की, आपणही टीव्हीमय झालोय. आपणही ब्रेकिंग न्यूजच्या हॅमरिंगमुळे टीव्हीऍडिक्ट झालोय. आपलीही जर हीच अवस्था असेल, तर मुलांना तरी काय दोष द्यायचा ? घराघरांत टीव्ही आहे, त्यावर दिवसरात्र असंख्य तऱ्हेची चॅनेल्स सुरु असतात. ते पाहताना ना डोळे थकतात ना माणसं... हातात रिमोट असूनही त्यावर आपला कंट्रोल नाही... इतके का अधीन झालोय आपण... ? डोक्यात भंजाळल्यासारखं होत असतानाच तास संपल्याची घंटा झाली. मास्तर भानावर आले. हा एक तास संपला पण, बाहेरच्या तासांचे काय ? तिथे भंजाळल्यासारखी परिस्थिती असताना भानावर आणणारी अशी खरंच कोणती घंटा आहे ?

- दुर्गेश सोनार (20 फेब्रुवारी 2010)

Tuesday, 14 July 2009

दिवस 'प्रतिभा संगम'चे...

१९९६ सालचा ऑगस्ट महिना असेल... एक दिवस सोलापूरच्या अभाविप कार्यालयातून फोन आला, 'अंमळनेरला प्रतिभा संगम हे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीचं राज्यस्तरीय संमेलन व्हायचंय. त्यासाठी जिल्ह्यातून आम्ही काही विद्यार्थी साहित्यिकांची नावं काढलीयत. त्यात तुझ्या नावाचा समावेश आहे. ' फोनवर फार काही चौकशी करता आली नाही. पण, त्यानंतर त्या संदर्भातलं एक पत्र घरच्या पत्त्यावर आलं. त्यानुसार मी माझ्या दोन कविता पाठवून दिल्या. त्यानंतर काही दिवस गेले आणि अचानक एके दिवशी अंमळनेरचं निमंत्रणच आलं. मला खूप बरं वाटलं. इतके दिवस पंढरपूर आणि सोलापूर जिल्हा असं सीमित असलेलं माझं साहित्यविश्व विस्तारण्यासाठी मला व्यासपीठ मिळणार होतं. गणपती विसर्जनाच्या दिवशी मी अंमळनेरला जाण्यासाठी निघालो. बाबाही मला सोलापूरपर्यंत सोडायला आले होते. सोलापुरातून आणखी काही जण माझ्यासोबत येणार होते. सोलापुरातल्या नव्या पेठेत अभाविपचं कार्यालय होतं. तिथं जमायचं होतं. आम्ही दुपारी साडे चारच्या सुमाराला तिथे पोहोचलो. कार्यालयाचा जुना लाकडी जिना चढत असताना बरंच काही डोळ्यांसमोर तरळत होतं. तिथे पोहोचताच सोलापुरातल्या अभाविप कार्यकर्त्यांनी माझी आपुलकीनं चौकशी केली. हा माझा विद्यार्थी परिषदेशी आलेला पहिला संपर्क...
अंमळनेरचं ते पहिलं प्रतिभा संगम आज तेरा वर्षांनंतरही माझ्या मनात अगदी तस्संच्या तस्सं ताजं आहे. राज्यभरातनं किमान सातशे ते आठशे विद्यार्थी साहित्यिक अंमळनेरच्या प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात एकत्र आले होते. मराठी साहित्यविश्वातले हे इतके ताजेतवाने अंकुर पहिल्यांदाच एके ठिकाणी एकत्र येणं, मान्यवर ज्येष्ठ साहित्यिकांनी त्यांना भरभरून मार्गदर्शन करणं... हा सगळा सोहळा खरंच अनुभवण्यासारखा होता. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीला सातशे वर्षं झाल्याचं औचित्य या सगळ्या खटाटोपामागे होतं. अवघ्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखं अभिजात साहित्य लिहिणारे संत ज्ञानेश्वर हे सगळ्या युवा साहित्यिकांचे मूळ प्रेरणास्रोत... प्राचार्य राम शेवाळकर यांचं ओघवत्या शैलीतलं उद्घाटनाचं भाषण ऐकून मी अक्षरशः भारावून गेलो होतो. कविवर्य मंगेश पाडगावकरांची कवी प्रवीण दवणे यांनी ' कविता फुलते कशी ? ' यावर घेतलेली प्रकट मुलाखत, गटागटातून रंगलेल्या विद्यार्थी साहित्यिकांच्या चर्चा, असं सगळं पोषक खत मिळत गेलं आणि माझ्यासारखे कितीतरी त्या वेळेसचे विद्यार्थी साहित्यिक रुजत गेले.
याच प्रतिभा संगममधून अशोक जेधे सारखा हळवा, भावूक कविमित्र भेटला, 'येगं येगं इंद्रायणी' ही अशोकची त्यावेळची कविता अजूनही मनात तशीच आहे, वहीमध्ये एखादं मोरपीस जपून ठेवावं नां अगदी तशी... आता अशोक नाहीये पण, त्याची ती कविता कायम स्मरणात आहे. नाशिकचा मंदार भारदे, नंदुरबारची निकीता असोदेकर, पुणे जिल्ह्यातला संतोष शेंडकर, लासलगावचा ऐश्वर्य पाटेकर या सारखे अनेक लिहिते हात ओळखीचे झाले. तर प्रा. नरेंद्र पाठक, प्रा. जयंत कुलकर्णी, प्रा. धनंजय कुलकर्णी यांच्या सारखी साहित्यावर प्रेम करणारी आणि नव्या अंकुरांना जोपासणारी माणसं आपली झाली. त्यांच्याशी मैत्र जिवांचं जोडलं गेलं. एवढंच नाही तर ज्यांना फक्त दिवाळी अंकांतून, कवितासंग्रहांतून, पुस्तकांतून भेटता आलं होतं अशा मंगेश पाडगावकर, द. मा. मिरासदार, इंद्रजित भालेराव, दासू वैद्य, रेणू पाचपोर, अरूणा ढेरे, भानू काळे या सारख्या साहित्यिकांना अगदी जवळून भेटण्याचा योग आला. यातून साहित्यविषयक जाणिवांचं क्षितीज विस्तारलं आणि लेखनाच्या आशाही उंचावत गेल्या. प्रतिभा संगमनं ग्रामीण भागातल्या कित्येक विद्यार्थी साहित्यिकांना लिहितं केलं, त्यांना विहरण्यासाठी पंखांत बळ दिलं. प्रतिभा संगमनं धारण केलेलं 'विस्तारणारी क्षितिजं... उंचावणाऱ्या आशा' हे ब्रीद त्यामुळेच तर सार्थ ठरतं. अंमळनेरच्या प्रतिभा संगम नंतर झालेल्या रत्नागिरीतल्या दुसऱ्या प्रतिभा संगममध्ये आणखी संधी मिळाली आणि एका वेगळ्या साहित्यिक चळवळीत सक्रिय होता आलं.
हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे विद्यार्थी परिषदेला पूर्ण होत असलेली साठ वर्षं... प्रतिभा संगम सारखं व्यासपीठ अभाविपनं निर्माण केलं नसतं तर कदाचित माझा अभाविपशी संबंध आलाच नसता आणि माझे साहित्यिक अनुबंध जुळले नसते. ज्ञान, चारित्र्य आणि एकता ही अभाविपची त्रिसूत्री... स्वामी विवेकानंद हे प्रेरणास्थान... चारित्र्यवान तरूण घडला तरच राष्ट्र घडेल, याची खूणगाठ बांधून ही संघटना काम करतेय. संघाच्या मुशीतून साकारलेल्या अभाविप बद्दल काही जणांना ऍलर्जी आहे. असेल तर असोत बापुडी... पण, एखादी संघटना गेली साठ वर्षं सातत्यानं काही ना काही विधायक उपक्रम राबवत असेल तर, त्यांच्या प्रयत्नांत खिळ घालण्यापेक्षा त्यांना बळ देणं हे केव्हाही चांगलं, नाही का ?
- दुर्गेश सोनार ( ९ जुलै २००९ )

Tuesday, 23 June 2009

आषाढस्य प्रथम दिवसे....

पावसाचा सांगावा घेऊन आलेला ज्येष्ठ संपतो आणि आषाढाला सुरूवात होते. निळ्या-जांभळ्या मेघांनी आभाळ भरून येतं, गरजू लागतं. पावसाचे टपोरे थेंब ताल धरू लागतात. मध्येच वाराही उनाड मुलासारखा धिंगाणा घालतो. उकाड्यानं त्रस्त झालेल्या धरेला आषाढसरींचा शिडकावा हवाहवासा वाटतो. मातकट गंधानं उल्हसित झालेलं असं वातावरण होरपळल्या मनाला तजेला देतं. पावसाचं भरभरून दान देणारी ही आषाढवेळा म्हणूनच तर महाकवी कालिदासालाही भावली असावी. वारकऱ्यांना पंढरीची ओढ लागते तीही आषाढातच... एकीकडे मुक्तपणे बरसरणारा निळा पाऊस आणि दुसरीकडे भक्तीरसात चिंबवणारा सावळा पाऊस... सारी किमया आषाढाचीच... कवितांमधूनही त्याचं प्रतिबिंब उमटलं नाही तरच नवल.... कवी नारायण सुमंत लिहितात...
निळ्या वावरात दिंड्या
आल्या वाजवित टाळ
गर्जे आखाडी आभाळ
गर्जे आखाडी आभाळ...!
गडगडाट तो मृदुंग
विज प्रकाशे लकाका
माऊलीच्या पालखीची
जशी झळके पताका...!
आषाढसरींमध्ये माऊलींचा पालखी सोहळा अनुभवणं ही बातच काही और आहे... वैष्णवांचा देव असलेला विष्णूही निळा आणि आषाढात बरसणारा पाऊसही निळा... विठूमाऊलीच्या जयघोषात टाळ मृदुंगांचा गजर आणि त्याच्या जोडीला आषाढात गर्जणाऱ्या मेघांचा मल्हार... एका बाजूला उधाण वाऱ्यानं धरलेला फेर, तर दुसरीकडे माऊलींच्या पालखीत वारकऱ्यांनी धरलेलं रिंगण.... पंढरीच्या दिशेनं पावलं चालत राहतात, भगव्या पताक्यांनी निळं आभाळ भरून जातं.. रंगांमधल्या समरसतेची प्रचिती देणारा हा आषाढ आणि त्याची साक्षात अनुभूती देणारा आषाढी वारीचा सोहळा.... नारायण सुमंतांसारख्या पंढरपूर परिसरातूनच लिहिता झालेल्या कवीला हे आषाढपण भावलं नाही तरच नवल.. सुमंत त्यांच्या आणखी एका कवितेत लिहितात...
थेंब आभाळी ना येतो
पूर भीमेसी ना येतो
तोच पंढरीचा काळा
माझ्या घामामंदी न्हातो...
अवघी सृष्टी पंढरी झाल्याचा हा दिव्य अनुभव... सुमंतांची ही काव्यानुभूती थेट संत सावता माळ्याशी नाळ जोडणारी आहे. `कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी`, असं म्हणणारे सावता माळी हेदेखील त्या अर्थी निसर्गकवीच म्हटले पाहिजेत... निसर्ग आणि अध्यात्म यांचा अनोखा मिलाफ आषाढात प्रकर्षानं प्रत्ययाला येतो. उन्हानं रापलेल्या काळ्या मातीला हिरवी झळाळी मिळते ती आषाढात... पुंडलिकाला भेटण्यासाठी जसा परब्रह्म आला तसाच पाऊसही धरेला भेटतो... जसा विठूमाऊलीचा अभंग आषाढात बहरतो, तसंच, धरेच्या ओटीपोटातून सृजनाचं हिरवं गाणं अंकुरतं.. शिवाराची वाटही मग पंढरीची वाटू लागते. नांगरणी झालेलं शिवार पेरतं होतं. पाटाच्या पाण्यात आषाढसरींचे थेंब असे मिसळतात की जशी चंद्रभागाच शिवारातून खळाळतं जाते... आषाढसरींचा हा सोहळा पदोपदी विठूरायाची आठवण करून देतो आणि जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी मग माहेराची सय ताजी होते...
- दुर्गेश सोनार ( २३ जून २००९ )

Thursday, 23 April 2009

...... उथळाचे श्रम वाया जाय !

बऱ्याच दिवसांनी आज लिहितोय. याचा अर्थ लिहिण्यासाठी अजिबात विषयच नव्हते, असा मुळीच नव्हे... थोडासा कंटाळा, काहीसा कामाचा ताण यामुळे लिहिण्यासाठी हवा तसा वेळ मिळत नव्हता. आता यावर तुम्ही म्हणाल आवड असली की सवड नक्की मिळते. हे शंभर टक्के मान्य आहे. पण, तशी वस्तुस्थिती प्रत्येक वेळी असतेच असं नाही. विषय कितीही डोक्यात घोळत असले तरी त्याला कागदावर मूर्त रुप देण्यासाठी काही तरी वेळ द्यायलाच हवा नां...! मनात आले आणि लिहून मोकळा झालो, इतकं सहज सोपं नसतं नां लिहिणं... बियाणं पेरलं म्हणून लगेच ते थोडंच उगवून येतं...? त्यासाठी जमिनीची मशागत करावी लागते, त्याची नांगरणी करावी लागते, थोडं खतपाणी करावं लागतं, आणि एवढं सगळं झालं की, ते बियाणं जोमानं उगवून यावं यासाठी सर्जनाचा पाऊस यावा लागतो. तर आणि तरच ते बियाणं जोरकसपणे उगवून येऊ शकतं... संत तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी म्हटलं होतं – खोल ओली पडे ते पिक उत्तम उथळाचे श्रम वाया जाय... ज्या पिकाची खोली उत्तम आहे, तेच पिक सकस उत्तम असतं... वर वर असलेलं उथळ असलेलं पिक वादळवाऱ्यात तग धरू शकत नाही. आणि हल्ली तर आजूबाजूला अशी वरवरची झुडुपं मोठ्या डौलात बहरताना दिसतात.. ही झुडुपं म्हणजेच खरेखुरे वटवृक्ष आहेत की काय असे वाटावे, अशी परिस्थिती मुद्दामहून निर्माण केली जाते. आपल्यालाही हेच मृगजळ खरे वाटायला लागते. ज्याच्याकडे मायेची सावली मागायला जावं, ते डेरेदार वृक्ष नाहीत तर फुटकळ झुडपं आहेत, हे समजेपर्यंत आपण परिस्थितीच्या उन्हात अगदी करपून गेलेले असतो. मोठी सावली देण्याचा आव आणणारी ही तथाकथित झाडं खरं तर बोन्सायच असतात. विशिष्ट विचारधारेला कवटाळून बसत आपल्याला सोयीचे तत्वज्ञान जगाला सांगणारी ही झाडं खुंटलेलीच असतात. त्यांची वाढ विशिष्ट चौकटीच्या पलिकडे होऊच शकत नाही. कारण अगदी स्पष्ट असतं. त्यांच्या मुळाशी एका विशिष्ट विचारधारेच्या तारेनं घट्ट बांधून ठेवलेलं असतं. आणि एकदा का ही विचारांची चौकट घट्ट पक्की झाली की, मग प्रत्येक प्रसंगाकडे हे लोक त्याच चौकटीच्या परिमाणातून पाहू लागतात. नदीच्या एकाच काठावर बसून ही मंडळी नदीच्या संपूर्ण भोवतालाचा अंदाज बांधू लागतात. त्यासाठी नदीच्या दुसऱ्या काठावर पण काही तरी आहे, तिथेही काही भोवताल आहे, हेच मुळी ते विसरून जातात. असो, तर अशी ही परिस्थिती असताना, लिहिण्यासाठी अजिबातच विषय नाही असे होणंच शक्य नाही... पण, लिहिण्यासाठी आवश्यक असणारी अंतःप्रेरणा जागृत करणारी परिस्थिती आजूबाजूला असते का, हे पाहावं लागतं. तरच नवं काही तरी लिहिलं जाऊ शकतं... अगदीच निराश व्हावं असं वातावरण असलं तरी त्यातही काही आश्वासक सूर आहेतच. ते गाते राहावेत, ते जुळून यावेत, यासाठी तरी आपले हात लिहिते राहावेत, नाही का ?

-          दुर्गेश सोनार