Thursday, 22 November 2012

कसाब – एक दंतकथा...!


मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी महमंद अजमल आमीर कसाब याला बुधवारी ( दि. २१ नोव्हेंबर) येरवडा कारागृहात सकाळी साडे सात वाजता फासावर लटकवण्यात आलं. या घटनेचे वार्तांकन बुधवारी दिवसभर सगळ्याच न्यूज चॅनेल्सवर सुरू होते. घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी सर्वच वर्तमानपत्रांमध्येही कसाबच्या फाशीचे विविध अँगल घेऊन रकानेच्या रकाने भरले गेले आहेत. या घटनेचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनी त्यांच्या त्यांच्या सोर्सेसमधून काही ना काही एक्स्लुसिव्ह किंवा वेगळं देण्याचा जो काही आटापिटा केला आहे, त्यातून अनेक गमतीजमती घडलेल्या दिसून येतात. मुळात कसाबला फाशी देण्यासाठी जे ऑपरेशन एक्स राबवले गेले, त्या बाबत कमालीची गोपनीयता बाळगली गेली. त्यामुळेच त्यातले तथ्य माध्यमांपर्यंत कितपत पोहोचले असेल हा एक संशोधनाचाच विषय आहे. या ऑपरेशन एक्समध्ये जे काही मोजके वरिष्ठ अधिकारी होते, त्यांनी बहुतेक सर्वच माध्यमांना प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. पण, त्यात कोणत्याही अधिकाऱ्याने ऑपरेशन एक्स नेमकं कसं पार पडलं, त्याचे कुठलेही सविस्तर तपशील दिलेले नाहीत. त्यामुळेच ऑपरेशन एक्सच्या अंमलबजावणीबाबत जे काही चित्र माध्यमांनी मांडले आहे, त्यात बऱ्याच अंशी कल्पनारंजन किंवा कल्पनाविलास असल्याचेच जाणवते. जोपर्यंत ऑपरेशन एक्सची अधिकृत माहिती त्या मोहिमेत सहभागी असलेल्या जबाबदार अधिकाऱ्याकडून सांगितली जात नाही, तो पर्यंत कसाबला दिलेली फाशी ही एक दंतकथाच बनून राहणार आहे.

कसाबला ऑर्थर रोड कारागृहातील अंडा सेलमधून बाहेर काढून येरवडा कारागृहात नेईपर्यंत आणि नंतर त्याला फासावर लटकावून त्याचा मृतदेह दफन करेपर्यंत इतकी गोपनीयता बाळगली गेली आहे, की नेमके काय घडले असेल याचा तर्कवितर्क लढवण्यातच बहुतेक सर्वच माध्यमांची दमछाक झाली असावी. त्यामुळेच जे काही वार्तांकन केले गेले, त्यात अनेक ठिकाणी सुरस सुरम्य कथा रंगवल्या गेल्याचे स्पष्टपणे जाणवते. या कथा अशा काही रंगवल्या आहेत की, त्या वाचून एखाद्या कसलेल्या साहित्यिकालाही त्याचा हेवाच वाटेल.

एका इंग्रजी वर्तमानपत्रात फासावर लटकावणाऱ्यापूर्वी कसाबने काय काय केले, याची एक सुरस फीचर स्टोरी छापण्यात आली आहे. यात कसाबला येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते, तेव्हा तो 'खुदा गवाह' या हिंदी सिनेमातील "ना जा ओ मेरे बादशाह, एक वादे के लिए एक वादा तोड के”, हे गाणे गात होता, असं म्हटलंय. आता यातलं खरं खोटं त्या कसाबला आणि त्या बातमीदाराच्या सोर्सलाच माहित ! इतकंच नाही तर सकाळी सकाळी उठल्यावर कसाब म्हणे चक्क दोन कप मसाला चहा प्यायला...! बरं, कसाबने साधंसुधं पाणी नाही तर चार बाटल्या मिनरल वॉटर प्यायल्याचे तपशीलही या इंग्रजी दैनिकाने छापले आहेत. तर दुसऱ्या एका इंग्रजी दैनिकात याच्या नेमकी उलटी माहिती देण्यात आली आहे. मंगळवारी रात्री कसाबला फाशीची कल्पना देण्यात आल्यानंतर त्याने त्या रात्री काहीही खाल्ले किंवा प्यायले नाही. तसंच तो भीतीने कापत होता आणि त्याला रात्रभर झोप नव्हती, असं त्या बातमीत म्हटलंय.
आणखी एका इंग्रजी दैनिकात अशीच एक बातमी वाचायला मिळाली. म्हणे, कसाबला जेव्हा फासावर लटकवण्यात येणार आहे, असं सांगण्यात आलं, तेव्हा तो फक्त हसला. आणि नंतर फाशीस्तंभाकडे नेत असताना त्याच्या चेहऱ्यावर कसल्याही प्रकारची भीती नव्हती. आता नियमांप्रमाणे म्हणाल तर ज्याला फाशी द्यायची आहे, त्याला फाशीस्तंभाकडे नेण्यापूर्वीच त्याच्या चेहऱ्यावर बुरखा घालतात. त्यामुळे कसाबच्या चेहऱ्यावर कसलीही भीती नव्हती, हे कुठल्या माहितीच्या आधारे लिहिले आहे, हे त्या वर्तमानपत्राच्या बातमीदारालाच माहित...!

आणखी एका गोष्टीची गंमत वाटली. ती म्हणजे कसाबला नेमक्या कोणत्या जल्लादाने फासावर लटकावले, यावरूनही प्रत्येक वर्तमानपत्रांत वेगवेगळी माहिती वाचायला मिळाली. एका मराठी वर्तमानपत्राने तर चक्क तीन जल्लादांनी कसाबला फाशी दिल्याचं म्हटलंय. तर काही वर्तमानपत्रांनी जल्लाद नसल्याने तुरुंग अधिकाऱ्यानेच फाशीचा खटका दाबल्याचे गृहमंत्र्यांचा हवाला देत म्हटलंय. तसंच, नेमक्या कोणत्या दिवशी आपल्याला फासावर लटकावले जाणार आहे, याची पूर्वकल्पना कसाबला देण्यात आली होती, याचीही बातमी बहुतेक सगळ्याच वर्तमानपत्रांनी ठळकपणे छापली आहे. मुळात डेथ वॉरंट आधीच संबंधित व्यक्तीला वाचून दाखवले जाते. तसेच ते कसाबलाही हिंदी आणि उर्दू भाषेतून वाचून दाखवण्यात आले होते. हा फाशीच्या प्रक्रियेचाच भाग आहे. त्यामुळे कसाबला आपल्या फाशीची तारीख आधीच माहिती होती, हे सांगून माध्यमांनी उगाचच वेगळी माहिती दिल्याचा आव आणला आहे, हेही स्पष्टपणे जाणवते.

मध्यंतरी कसाबला डेंगी झाल्याची बातमीही सगळ्याच प्रसारमाध्यमांमध्ये ठळकपणे प्रसिद्ध झाली होती. त्यात भर म्हणून कसाबवर मध्यंतरी हर्नियाचे उपचार करण्यात आले होते आणि त्याला एक आठवडा मुंबईतल्या सेंट जॉर्ज रुग्णालयात ठेवण्यात आले होते, अशीही एक बातमी समोर आली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कसाबला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, याची रुग्णालयातल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना सूतराम कल्पनाही नव्हती म्हणे...! आता या बातमीत तथ्य कितपत आहे हे त्या वर्तमानपत्राच्या बातमीदारालाच ठाऊक...!

कसाबला बिर्याणी दिली जात असल्याच्या बातम्याही जेव्हा कसाबचा खटला सुरू होता, तेव्हा यायच्या. मात्र, आता त्याला फाशी दिल्यानंतर ज्या बातम्या आल्या आहेत, त्यात कसाबला त्याच्या तुरुंगातील वास्तव्यादरम्यान कधीही मांसाहारी जेवण दिले नव्हते, असा उल्लेख आढळून आला. याचाच अर्थ यापूर्वी कसाबला बिर्याणी दिली जात असल्याच्या आलेल्या बातम्या म्हणजे अर्थातच हवेत सोडलेले पतंग होते. तुरुंगाच्या नियमांनुसार कसाबला शाकाहारी जेवणच दिले जायचे आणि कधी कधी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला अंडी दिली जात असत, असं एका बातमीत स्पष्टपणे लिहिले आहे. त्यामुळेच कसाब आणि त्याचे खाणे ही सुद्धा एक दंतकथाच म्हणावी लागेल.

आता सर्वसामान्य लोकांना हे वाचून खरंच गंमत वाटली असेल. अनेकांचं कुतूहल यामुळे शमलेही असेल. तर काही जणांचं कुतूहल यामुळे आणखी वाढले असेल, हे नक्की. सर्वसामान्य माणसांना कसाबच्या फाशीच्या अनुषंगाने मनात जे काही प्रश्न पडले असतील, त्याचे उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न केला, असा यावर माध्यमांचा दावा नक्कीच असू शकतो. तसा तो करण्यात काहीही गैर नाही. पण, हे करत असताना मर्यादांचे भानही राखायला हवे, असे वाटते.

दुर्गेश सोनार ( दिनांक 22 नोव्हेंबर 2012)

Thursday, 7 April 2011

अण्णांचे आंदोलन, मीडिया आणि काही मूलभूत प्रश्न...


ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नवी दिल्लीत जंतरमंतरवर बेमुदत उपोषण सुरू केलंय. बहुप्रतिक्षित लोकपाल विधेयक संमत व्हावं, यासाठी अण्णांनी उपोषणाचं हत्यार उपसलंय. या आंदोलनात अण्णांना देशभरातून सर्वच स्तरांतून वाढता पाठिंबा मिळतोय. भ्रष्टाचारमुक्त देशाच्या निर्मितीसाठी लोकपाल विधेयक अत्यंत आवश्यक आहे. ते मंजूर होऊन भ्रष्टाचाराला आळा बसावा, हा शुद्ध हेतू अण्णांच्या आंदोलनाचा नक्कीच आहे. अण्णा उपोषणाला बसल्यापासून देशभरातली सगळी प्रसारमाध्यमं विशेषतः सगळ्या चोवीस तास वृत्तवाहिन्या याच विषयाच्या बातम्या सातत्यानं दाखवत आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांतल्या वाहिन्यांनी अण्णांच्या आंदोलनाची बातमी सातत्यानं लावून धरलीय. बहुतेक वाहिन्या जंतरमंतरवरून आंदोलनाचे लाईव्ह दाखवत आहेत. काही वाहिन्यांनी तर अण्णा के अनशन के अमुक अमुक घंटे असं सतत टीव्ही स्क्रीनवर सुरूच ठेवलंय. वर्ल्ड कप होता तेव्हा मॅचचा स्कोअर दाखवायचे तसं या वाहिन्या अण्णा के अनशन के अमुक अमुक घंटे असं चालवतायत. तर काही वाहिन्यांनी अण्णांचं मेडिकल अपडेटही द्यायला सुरूवात केलीय. म्हणजे अमुक अमुक वाजता अण्णांचा बीपी किती होता... वगैरे वगैरे.... हे कमी म्हणून की काय, बहुतेक सगळ्या चोवीस तास वाहिन्यांवर अण्णा हजारेंच्या आंदोलनाबाबत अखंड चर्चाचर्वण सुरू आहे. समाजातले सगळे विचारवंत विश्लेषक वेगवेगळ्या वाहिन्यांच्या टॉक शोजमध्ये आपापली मतं मांडतायत. देशभरात सध्या फक्त एक आणि एकच चर्चेचा विषय आहे आणि तो म्हणजे अण्णांचे आंदोलन...!

आता हे सगळं पाहत असताना प्रसारमाध्यमांच्या अनुषंगाने मनात काही प्रश्न निर्माण झाले. अण्णांनी आंदोलनाचा मुहूर्त निवडला तो पाच एप्रिलचा.... म्हणजे वर्ल्ड कप संपून तीन दिवस उलटून गेलेले आणि आयपीएल सुरू व्हायला तीन दिवस शिल्लक... वर्ल्ड कप भारतानं जिंकला दोन एप्रिलला... त्यानंतर जवळपास दोन दिवस धोणी धुरंधरांच्या सुरस यशोगाथा गाण्यात सगळा मीडिया बिझी होता. त्यातच सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार दिला जावा, अशी मागणी सगळ्याच स्तरातून होऊ लागली. त्याचीही चर्चा मीडियावर बरीच रंगली.. क्रिकेटचा हा हँगओव्हर उतरत असतानाच अण्णांचं आंदोलन सुरू झालं आणि आख्खा मीडिया त्यावर अधाशासारखा तुटून पडला. कारण वर्ल्ड कप संपल्यानंतर मीडियाकडे चघळायला विषय तरी कुठे होता...? अण्णांच्या आंदोलनाविषयी खरंच किती पोटतिडकीनं सगळ्या वाहिन्या वार्तांकन करतायत हा कळीचा आणि चर्चेचा मुद्दा आहे. मीडियाची अण्णांच्या आंदोलनाविषयी असलेली बांधिलकी किती खरी आणि किती खोटी हे आयपीएल सुरू झालं की लगेचच समोर येईल. कारण एकदा का आयपीएल सुरू झालं की त्याच्याच बातम्या सुरू होतील आणि लोकपाल विधेयकाचा झेंडा घेऊन मैदानात उतरलेल्या अण्णांच्या बातम्या कुठल्या कुठे मागे पडतील... बरं आणि या वाहिन्या अण्णांच्या आंदोलनाचं जे वार्तांकन करतायत तेही फार मजेशीर आहे. यात कुठेही अण्णांनी मांडलेला मूळ मु्द्दा माध्यमांनी ( काही सन्माननीय अपवाद वगळता ) मांडलेला नाही. लोकपाल विधेयक नेमकं आहे काय, त्यातल्या तरतुदी काय आहेत, हे विधेयक गेली ४२ वर्षं प्रलंबित का आहे, त्याची कारणं काय आहेत, यावर कुठेही फोकस केलेला दिसला नाही... दिसलं ते फक्त 'अण्णांच्या वादळापुढे सरकार नमले', 'मनमोहनसिंग सरकार अण्णांच्या प्रश्नांपुढे निरुत्तर', 'पवारांनी मंत्रिगटाचा दिला राजीनामा', 'सोनियांनी अण्णांना केली विनंती'... वगैरे, वगैरे.... आणि अण्णांच्या आंदोलनाला सेलिब्रेटींनी दिलेला पाठिंबा... आमीर खान, मधुर भांडारकर, दिया मिर्झा, रझा मुराद, अनुपम खेर यासारखी बॉलिवूडमधली मंडळी अण्णांच्या पाठिशी उभी राहिली. त्यामुळे या आंदोलनाला ग्लॅमर मिळालं. वाहिन्यांनी नेमकं तेच टिपलं... शेवटी प्रश्न टीआरपीचाही आहे. फक्त अण्णा हजारे चोवीस तास दाखवून वाहिन्यांना हवा तसा टीआरपी मिळेल ? हां... या सगळ्यांत एक जमेची बाजू नक्कीच आहे आणि ती म्हणजे मीडियाच्या अशा प्रकारच्या कव्हरेजमुळे अण्णा हजारे खऱ्या अर्थानं 'नॅशनल फिगर' झाले...!

दुसरा मुद्दा... फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साईटसवर अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे ग्रुप तयार होऊ लागलेयत. अण्णांना पाठिंबा व्यक्त करणारे मजकूर लिहिले जाऊ लागलेयत. पण, हे सगळं एखादी लागण व्हावं तसं आहे असं मला वाटतं. एखाद्यानं लिहिलं आणि त्याला फेसबुक वॉलवर लाईक केलं किंवा त्यावर कमेन्ट टाकली म्हणजे आपण अण्णांच्या कार्याला हातभार लावला असं अनेकांना वाटू शकतं. हा धोका यात आहे. फक्त फेसबुक वॉलवर लिहून अण्णांचा हेतू साध्य होणार नाही हे सुज्ञ नेटिझन्सनी ध्यानात घ्यायला हवं. अण्णांनी सुरू केलेली ही लढाई म्हणजे फक्त सुरुवात आहे.... जोपर्यंत लोकपाल विधेयक संमत होत नाही, भ्रष्टाचाराला आळा घातला जात नाही तोपर्यंत ही लढाई फलद्रूप होऊ शकणार नाही. मीडियानंही हे लक्षात घ्यायला हवं... उगंच, पळा रे पळा रे.. लाईव्ह करा रे करा रे... बाईट घ्या रे घ्या रे... असं नुसतं पळापळ करून चालणार नाही. लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण आहोत, हे लक्षात घेऊन तो अधिक बळकट कसा होईल, हे पाहायला हवे.
- दुर्गेश सोनार  

Sunday, 10 October 2010

9 ऑक्टोबरच्या निमित्ताने

9 ऑक्टोबर... तसा इतर दिवसांसारखाच हाही एक दिवस.... पण, या दिवसाचं माझ्या लेखी फार वेगळं मोल आहे... कारण दुर्गेश दिगंबर सोनार या व्यक्तिमत्त्वाचा जन्म याच दिवशी झाला. पंढरपूर सारख्या छोट्या शहरात नवरात्रातल्या आठव्या माळेला म्हणजेच दुर्गाष्टमीला रात्री सव्वा अकरा - साडे अकराच्या सुमाराला माझा जन्म झाला. आता या गोष्टीला काल म्हणजे 9 ऑक्टोबरला 32 वर्षं पूर्ण झाली. आयुष्यातली ही एवढी वर्षं सरल्याची जाणीव होत असतानाच आता किती वर्षं उरलीयत याचीही एक गडद जाणीव मनात घोळतेय....

दिवसभरांत अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, एसएमएस केले, फोन केले, फेसबुक आणि ऑर्कुटवरही शुभेच्छा व्यक्त केल्या. ऑफिसमध्येही सहकाऱ्यांनी केक आणला.... हे सगळं करत असताना मी माझ्या बालपणात हरवून गेलो...  मला आठवतं... आम्ही शाळेत असताना आई बाबा आमच्या प्रत्येकाचा वाढदिवस मोठ्या हौसेने करायचे.. आमच्या शाळेतल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना आवर्जून घरी बोलवायचे... त्यावेळेसचा मेनूही तसा ठरलेलाच असायचा... गोड पदार्थ म्हणून गुलामजामुन किंवा मला आवडतात म्हणून बेसन लाडू... पंढरपूरचे चिरमुरेही प्रसिद्ध... त्यामुळे आईने केलेला खमंग चिवडाही असायचा... कधी कधी आमच्या हट्टाखातर आई इडली सांबरही करायची...  बालपणी वाढदिवस म्हणजे खूप आनंदाचा दिवस असायचा... नवे कपडे घालायचे... मित्रमैत्रिणींसोबत आईने केलेला खाऊ खायचा... भेटवस्तू स्वीकारायच्या... खेळ खेळायचे.... असं बरंच काही.... या सगळ्यामध्ये आपलं वय वाढतंय याची जाणीव त्या काळात फारशी व्हायची नाही... ती जाणीव हळूहळू व्हायला लागली आणि माझा वाढदिवसाकडे बघण्याचा दृष्टीकोन आपोआपच बदलला.

आता वाढदिवसाचे फारसे अप्रूप वाटत नाही. उलट आयुष्यातलं एक वर्षं संपल्याचं जाणवत राहतं... आता जी काही वर्षं उरली असतील, त्यामध्ये बरंच काही साध्य करायचं आहे... त्यासाठी करावी लागणारी मेहनत, त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न... याची मला मनापासून जाणीव आहे. आजवरच्या आयुष्यात मला खूप काही मिळालंय... सुप्रियासारखी समजूतदार आयुष्याची जोडीदार आणि आमच्या संसारवेलीवर शताक्षीच्या रुपानं फुललेलं गोंडस फूल... दिवस कितीही कामात गेला, कितीही तणावाखाली गेला... तरी रात्री घरी आल्यानंतर शताक्षीचे बा बा बा बा असे बोबडे बोल ऐकले की सारं काही विसरून जातं... मन अगदी मोकळं मोकळं होऊन जातं... तिच्या दिवसेंदिवस प्रगल्भ होत जाणाऱ्या बाललीला... आपलं बालपण पुन्हा आपल्यासमोर येतं ते असं... तिचं असं वाढणं.... मी पाहत राहतो.... आता तिचेच वाढदिवस....

- दुर्गेश सोनार ( 10 ऑक्टोबर 2010 )

Tuesday, 6 April 2010

संमेलनाच्या मांडवकळा...

पुण्यनगरीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊन आता दहा एक दिवस उलटून गेले आहेत. पण, मोरोपंतांच्या मनात अजूनही या संमेलनाच्या मांडवकळा सुरूच आहेत. अमिताभच्या खास कमावलेल्या आवाजातलं मधुशाला ऐकताना मोरोपंतांचे कान तृप्त झाले होते. अवघं मराठी साहित्य विश्व या मधुशालेच्या एकाच प्यालात फेसाळताना मोरोपंतांनी याचि देही याचि डोळा अनुभवलं होतं. तसं तर मोरोपंतांना संमेलनाध्यक्ष डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्याविषयी विशेष आत्मीयता.... पण, समारोपाला बच्चन महोदयांच्या उपस्थितीमुळे साक्षात् दभि सुद्धा भांबावलेले* दिसले. (*मोरोपंतांना खरं तर भांबावलेले या शब्दाऐवजी भंजाळलेले हा शब्दप्रयोग अपेक्षित असावा, पण, मराठी समीक्षेत या शब्दाला प्रमाण भाषेचा दर्जा मिळाला आहे किंवा नाही या बद्दल त्यांच्या मनात साशंकता आहे.) संमेलनाचं फलित काय, त्यात चर्चिले गेलेले साहित्यविषयक मुद्दे यांचा अध्यक्ष या नात्याने दभिंनी साक्षेपी समारोप करणं अपेक्षित होतं. पण, झालं भलतंच... ते तर शरिरासारखीच अभिनयातही उंची गाठलेल्या अमिताभकडे पाहून भारावून गेले होते आणि आपण काय मुद्दे मांडतो आहोत, याचं भानच त्यांना उरलं नाही... त्यांच्या पंधरा वीस मिनिटांच्या भाषणातला बहुतांश भाग हा अमिताभजींचं कौतुक करण्यातच खर्ची पडला. आपल्या आवडत्या उत्तम समीक्षकाच्या अध्यक्षीय समारोपाची अशी समीक्षा करावी लागेल, याचा बहुत खेद मोरोपंतांना वाटत होता. तीच सल त्यांच्या मनात अजूनही बोचते आहे.


नाही म्हणायला संमेलन पुण्यप्रभावी ठरले हे खरंच आहे. काय नव्हतं बरं त्या संमेलनात... सगळं काही होतं... ज्ञानपीठ विजेते विंदा म्हणायचे तसं ‘तेच तें तेच तें…..’ नक्कीच होतं. म्हणजे बघा, तेच वाद, तेच विषय, तेच वक्ते... सारं कसं तेच तें... पुण्यनगरीतच जेव्हा पहिलं ग्रंथकारांचं संमेलन झालं तेव्हापासूनच खरं तर वादांची संगत संमेलनाशी जोडली गेली. एका अर्थी वाद हे साहित्य संमेलनाच्या पाचवीला पुजले गेलेयत. पण, त्या काळातले वाद हे शंभर टक्के साहित्यविषयक वाद असायचे... पण, आजकालचे वाद हे फुटकळ आणि क्षुल्लक असतात. पराचा कावळा करणे अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. त्याचंच प्रत्यंतर सध्याच्या काळात येत असल्यानं मोरोपंतांची साहित्यिक अस्वस्थता दिवसेंदिवस वाढतच चाललीय. आता, यंदाच्या संमेलनात वादाची बांग दिली सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी... व्यसनाने बरबटलेला पैसा संमेलनासाठी का वापरावा, असा खडा सवाल त्यांनी संमेलनाच्या स्मरणिका प्रकाशन समारंभात केला आणि तिथून वाद रंगत गेला. आता माणिकचंदशी संबंधित वाद आहे म्हटल्यावर तो रंगणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नसावी... साहित्यातले सगळे ‘उंचे लोग’ आपापली साहित्यिक ‘उंची पसंद’ घेऊन वादात उतरले. कशी गंमत आहे पहा... समारोपातही वादाची एक वेगळीच उंची बघायला मिळाली. याला म्हणतात संमेलन वेगळ्या उंचीवर जाणे... असो, विषय तत्वाचा होता. पण, संयोजकांनी कुठे स्वतःहून माणिकचंदचं प्रायोजकत्व नाकारलं ? दस्तुरखुद्द माणिकचंदवाल्यांनीच आपलं प्रायोजकत्व मागे घेतलं आणि वादावर पडदा टाकला.. पण, मोरोपंतांच्या मनात तरीही हा वाद कुठेतरी बाकी होताच... संमेलन सुरु झालं आणि रसिकांसाठी, निमंत्रितांसाठी जे पाणी दिलं जात होतं त्यावर तर चक्क माणिकचंदचाच ब्रँड होता... व्यसनांचा पैसा नको तर मग त्यांच्या ब्रँडचे पाणी तरी कशाला हवे, असा एक सहजप्रश्न मोरोपंतांना एकसारखा पडत होता.

संमेलन तर सुरू झालं... आणि त्याचबरोबर वादाचा नवा अंकही सुरू झाला. अमिताभ बच्चन समारोपाला येणार, त्याच्यासोबत मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार, हे संयोजक म्हणतात, तसं खूप आधी ठरलेलं.. पण, काँग्रेसच्या संस्कृतीला ते रुचलं नसावं... अमिताभची ऍलर्जी असलेल्या काँग्रेस श्रेष्ठींची नाराजी नको, म्हणून मुख्यमंत्र्यांनी शक्कल लढवली. त्यांनी संमेलनाला दुसऱ्याच दिवशी भेट दिली. अहो, पण, त्यामुळे नियोजित परिसंवादांचा बोऱ्या वाजला... माध्यमांनाही परिसंवादांपेक्षा ‘सीएम – बिग बी – काँग्रेस’ या वादातच स्वारस्य होतं... म्हणजे संमेलनाला साहित्यिक मूल्य म्हणून जेवढी प्रसिद्धी मिळायला हवी होती, त्याऐवजी असल्या फालतू वादांमुळेच अधिक प्रसिद्धी मिळालेली पाहून मोरोपंत अक्षरशः हलबलले....

असं म्हणतात वय वाढत जातं तसं माणूस अनुभवानं परिपक्व होत जातो... इथे तर साहित्य संमेलनाला शंभर वर्षांची परंपरा आहे. आता जे झालं ते संमेलन तर 83 वं होतं... म्हणजे, वय वाढत चाललेल्या साहित्य संमेलनांमध्येही पक्वता यायला हवी... पण, प्रत्यक्षात ही संमेलनं जख्ख म्हातारी होत चाललीयत, त्यांना कसलाही साहित्यिक बैठकीचा आधार नाही... राजकीय आणि पैसेवाल्यांच्या बेगडी दिखाऊपणाचं ओझं घेऊन संमेलनं वाकत चाललीयत... मोरोपंतांसारखा खरा रसिक संमेलनाची ही साहित्यिक विटंबना पाहून धास्तावला आहे...

- दुर्गेश सोनार ( 7 एप्रिल 2010)

Friday, 19 February 2010

शिक्षणाच्या ...... घो !

शाळेची घंटा झाली. वर्ग भरले. नवं शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतरचा शाळेचा पहिलाच दिवस. सातवीतल्या वर्गात गटणे मास्तर हजेरीबुक घेऊन घुसले. सुस्मित वदनानं मास्तरांनी मुलांकडे पाहिलं. मुलांनीही ‘गुड मॉर्निंग सर...’ असं उच्चरवात मास्तरांचं स्वागत केलं. मास्तरांनी मग एकेका मुलाला त्यांचं नाव विचारायला सुरवात केली. एकेक करता करता त्यांनी एका मुलाला विचारलं, ‘व्हॉट इज युवर नेम ?’ त्यावर तो तप्तरतेनं उत्तरला, ‘माय नेम इज खान !’ असेल बुवा त्याचं नाव असं म्हणत मास्तरांनी पुढच्या मुलाकडे मोर्चा वळवला. त्याला त्याचं नाव विचारलं, तर तो खर्ज लावून म्हणाला, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय...!’ अरे देवा, हा काय प्रकार असं म्हणत मास्तर एकदम बुचकळ्यात पडले. तितक्यात एक जण हातात झेंडा घेऊन उभा राहिला आणि मास्तरांना विचारू लागला, ‘आपली माणसं आपलीच माती, तरी मेंढराची कळपास भीती... या कवितेचा अर्थ काय ?’ मास्तर आणखीच गोंधळले. मराठीच्या अभ्यासक्रमात तर ही कविता कुठेच नाही आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांना कवितेचा प्रश्न कसा काय पडावा, याचं मास्तरांना आश्चर्यच वाटलं. वेळ मारून नेण्यासाठी ते म्हणाले, ‘मुलांनो, आज तर पहिलाच दिवस आहे शाळेचा, यथावकाश आपण शिकणारच आहोत नां...!’ आता खडू घेऊन मास्तर फळ्याकडे वळले. बघतात तर काय, फळ्यावर मोठ्या अक्षरांत आधीच लिहून ठेवलेलं, ‘ब्रेकिंग न्यूज...!’ आता बोंबला... ‘हा काय प्रकार आहे ?’ मास्तरांनी त्रासिकपणे मुलांना विचारलं. मुलं एका सुरांत उत्तरली, आमच्या घरांत टीव्हीवर सतत सुरु असते ती ब्रेकिंग न्यूज... शाळेत तुम्ही जे शिकवता, त्याहीपेक्षा कितीतरी रंजक आणि सुरस गोष्टी आम्हाला ब्रेकिंग न्यूज मधूनच शिकायला मिळतात. आम्हाला तुमचं नेहमीचं पुस्तकबंद शिक्षण नकोय, आम्हाला असंच ब्रेकिंग न्यूजवालं चटपटीत, खुसखुशीत रंजक शिक्षण हवंय... म्हणजे बघा, युवराज राहुल गांधी मुंबईत आले. त्यांना शिवसेना काळे झेंडे दाखवणार होती. पण, राहुल भलतेच हुशार निघाले. त्यांनी थेट लोकल गाठली. तिकिटाला पैसे हवे म्हणून एटीएममधनं पैसे काढले. आता हे सगळे एवढे नाट्यमय थ्रिलर प्रकार आम्हाला कसे कळले, सांगा बरं मास्तर..? अहो, चोवीस तास चालणाऱ्या ब्रेकिंग न्यूजमधनंच तर आम्हाला ही अत्यंत उद् बोधक माहिती मिळाली. अहो, टीव्ही हे ज्ञानार्जनाचे उत्तम साधन आहे, हे काय उगाच थोरामोठ्यांनी लिहून ठेवलंय ? ....


मुलांच्या या भडिमारामुळे गटणे मास्तर अधिकच चक्रावले. शाळेच्या पहिल्याच दिवशी पहिल्याच तासाला मुलांचे हे असे प्रश्न... म्हणजे माय नेम इज खानच्या फर्स्ट डे फर्स्ट शोला शिवसैनिकांनी केलेला गोंधळच... अशी भावना मास्तरांची झाली. अरे हे काय आपल्यालाही सिनेमाचीच उपमा कशी काय आठवावी ? गटणे मास्तर आणखीनच कोड्यात पडले. क्षणभर डोळे मिटून घेतल्यावर त्यांना लक्षात आलं की, आपणही टीव्हीमय झालोय. आपणही ब्रेकिंग न्यूजच्या हॅमरिंगमुळे टीव्हीऍडिक्ट झालोय. आपलीही जर हीच अवस्था असेल, तर मुलांना तरी काय दोष द्यायचा ? घराघरांत टीव्ही आहे, त्यावर दिवसरात्र असंख्य तऱ्हेची चॅनेल्स सुरु असतात. ते पाहताना ना डोळे थकतात ना माणसं... हातात रिमोट असूनही त्यावर आपला कंट्रोल नाही... इतके का अधीन झालोय आपण... ? डोक्यात भंजाळल्यासारखं होत असतानाच तास संपल्याची घंटा झाली. मास्तर भानावर आले. हा एक तास संपला पण, बाहेरच्या तासांचे काय ? तिथे भंजाळल्यासारखी परिस्थिती असताना भानावर आणणारी अशी खरंच कोणती घंटा आहे ?

- दुर्गेश सोनार (20 फेब्रुवारी 2010)

Tuesday, 14 July 2009

दिवस 'प्रतिभा संगम'चे...

१९९६ सालचा ऑगस्ट महिना असेल... एक दिवस सोलापूरच्या अभाविप कार्यालयातून फोन आला, 'अंमळनेरला प्रतिभा संगम हे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीचं राज्यस्तरीय संमेलन व्हायचंय. त्यासाठी जिल्ह्यातून आम्ही काही विद्यार्थी साहित्यिकांची नावं काढलीयत. त्यात तुझ्या नावाचा समावेश आहे. ' फोनवर फार काही चौकशी करता आली नाही. पण, त्यानंतर त्या संदर्भातलं एक पत्र घरच्या पत्त्यावर आलं. त्यानुसार मी माझ्या दोन कविता पाठवून दिल्या. त्यानंतर काही दिवस गेले आणि अचानक एके दिवशी अंमळनेरचं निमंत्रणच आलं. मला खूप बरं वाटलं. इतके दिवस पंढरपूर आणि सोलापूर जिल्हा असं सीमित असलेलं माझं साहित्यविश्व विस्तारण्यासाठी मला व्यासपीठ मिळणार होतं. गणपती विसर्जनाच्या दिवशी मी अंमळनेरला जाण्यासाठी निघालो. बाबाही मला सोलापूरपर्यंत सोडायला आले होते. सोलापुरातून आणखी काही जण माझ्यासोबत येणार होते. सोलापुरातल्या नव्या पेठेत अभाविपचं कार्यालय होतं. तिथं जमायचं होतं. आम्ही दुपारी साडे चारच्या सुमाराला तिथे पोहोचलो. कार्यालयाचा जुना लाकडी जिना चढत असताना बरंच काही डोळ्यांसमोर तरळत होतं. तिथे पोहोचताच सोलापुरातल्या अभाविप कार्यकर्त्यांनी माझी आपुलकीनं चौकशी केली. हा माझा विद्यार्थी परिषदेशी आलेला पहिला संपर्क...
अंमळनेरचं ते पहिलं प्रतिभा संगम आज तेरा वर्षांनंतरही माझ्या मनात अगदी तस्संच्या तस्सं ताजं आहे. राज्यभरातनं किमान सातशे ते आठशे विद्यार्थी साहित्यिक अंमळनेरच्या प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात एकत्र आले होते. मराठी साहित्यविश्वातले हे इतके ताजेतवाने अंकुर पहिल्यांदाच एके ठिकाणी एकत्र येणं, मान्यवर ज्येष्ठ साहित्यिकांनी त्यांना भरभरून मार्गदर्शन करणं... हा सगळा सोहळा खरंच अनुभवण्यासारखा होता. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीला सातशे वर्षं झाल्याचं औचित्य या सगळ्या खटाटोपामागे होतं. अवघ्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखं अभिजात साहित्य लिहिणारे संत ज्ञानेश्वर हे सगळ्या युवा साहित्यिकांचे मूळ प्रेरणास्रोत... प्राचार्य राम शेवाळकर यांचं ओघवत्या शैलीतलं उद्घाटनाचं भाषण ऐकून मी अक्षरशः भारावून गेलो होतो. कविवर्य मंगेश पाडगावकरांची कवी प्रवीण दवणे यांनी ' कविता फुलते कशी ? ' यावर घेतलेली प्रकट मुलाखत, गटागटातून रंगलेल्या विद्यार्थी साहित्यिकांच्या चर्चा, असं सगळं पोषक खत मिळत गेलं आणि माझ्यासारखे कितीतरी त्या वेळेसचे विद्यार्थी साहित्यिक रुजत गेले.
याच प्रतिभा संगममधून अशोक जेधे सारखा हळवा, भावूक कविमित्र भेटला, 'येगं येगं इंद्रायणी' ही अशोकची त्यावेळची कविता अजूनही मनात तशीच आहे, वहीमध्ये एखादं मोरपीस जपून ठेवावं नां अगदी तशी... आता अशोक नाहीये पण, त्याची ती कविता कायम स्मरणात आहे. नाशिकचा मंदार भारदे, नंदुरबारची निकीता असोदेकर, पुणे जिल्ह्यातला संतोष शेंडकर, लासलगावचा ऐश्वर्य पाटेकर या सारखे अनेक लिहिते हात ओळखीचे झाले. तर प्रा. नरेंद्र पाठक, प्रा. जयंत कुलकर्णी, प्रा. धनंजय कुलकर्णी यांच्या सारखी साहित्यावर प्रेम करणारी आणि नव्या अंकुरांना जोपासणारी माणसं आपली झाली. त्यांच्याशी मैत्र जिवांचं जोडलं गेलं. एवढंच नाही तर ज्यांना फक्त दिवाळी अंकांतून, कवितासंग्रहांतून, पुस्तकांतून भेटता आलं होतं अशा मंगेश पाडगावकर, द. मा. मिरासदार, इंद्रजित भालेराव, दासू वैद्य, रेणू पाचपोर, अरूणा ढेरे, भानू काळे या सारख्या साहित्यिकांना अगदी जवळून भेटण्याचा योग आला. यातून साहित्यविषयक जाणिवांचं क्षितीज विस्तारलं आणि लेखनाच्या आशाही उंचावत गेल्या. प्रतिभा संगमनं ग्रामीण भागातल्या कित्येक विद्यार्थी साहित्यिकांना लिहितं केलं, त्यांना विहरण्यासाठी पंखांत बळ दिलं. प्रतिभा संगमनं धारण केलेलं 'विस्तारणारी क्षितिजं... उंचावणाऱ्या आशा' हे ब्रीद त्यामुळेच तर सार्थ ठरतं. अंमळनेरच्या प्रतिभा संगम नंतर झालेल्या रत्नागिरीतल्या दुसऱ्या प्रतिभा संगममध्ये आणखी संधी मिळाली आणि एका वेगळ्या साहित्यिक चळवळीत सक्रिय होता आलं.
हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे विद्यार्थी परिषदेला पूर्ण होत असलेली साठ वर्षं... प्रतिभा संगम सारखं व्यासपीठ अभाविपनं निर्माण केलं नसतं तर कदाचित माझा अभाविपशी संबंध आलाच नसता आणि माझे साहित्यिक अनुबंध जुळले नसते. ज्ञान, चारित्र्य आणि एकता ही अभाविपची त्रिसूत्री... स्वामी विवेकानंद हे प्रेरणास्थान... चारित्र्यवान तरूण घडला तरच राष्ट्र घडेल, याची खूणगाठ बांधून ही संघटना काम करतेय. संघाच्या मुशीतून साकारलेल्या अभाविप बद्दल काही जणांना ऍलर्जी आहे. असेल तर असोत बापुडी... पण, एखादी संघटना गेली साठ वर्षं सातत्यानं काही ना काही विधायक उपक्रम राबवत असेल तर, त्यांच्या प्रयत्नांत खिळ घालण्यापेक्षा त्यांना बळ देणं हे केव्हाही चांगलं, नाही का ?
- दुर्गेश सोनार ( ९ जुलै २००९ )

Tuesday, 23 June 2009

आषाढस्य प्रथम दिवसे....

पावसाचा सांगावा घेऊन आलेला ज्येष्ठ संपतो आणि आषाढाला सुरूवात होते. निळ्या-जांभळ्या मेघांनी आभाळ भरून येतं, गरजू लागतं. पावसाचे टपोरे थेंब ताल धरू लागतात. मध्येच वाराही उनाड मुलासारखा धिंगाणा घालतो. उकाड्यानं त्रस्त झालेल्या धरेला आषाढसरींचा शिडकावा हवाहवासा वाटतो. मातकट गंधानं उल्हसित झालेलं असं वातावरण होरपळल्या मनाला तजेला देतं. पावसाचं भरभरून दान देणारी ही आषाढवेळा म्हणूनच तर महाकवी कालिदासालाही भावली असावी. वारकऱ्यांना पंढरीची ओढ लागते तीही आषाढातच... एकीकडे मुक्तपणे बरसरणारा निळा पाऊस आणि दुसरीकडे भक्तीरसात चिंबवणारा सावळा पाऊस... सारी किमया आषाढाचीच... कवितांमधूनही त्याचं प्रतिबिंब उमटलं नाही तरच नवल.... कवी नारायण सुमंत लिहितात...
निळ्या वावरात दिंड्या
आल्या वाजवित टाळ
गर्जे आखाडी आभाळ
गर्जे आखाडी आभाळ...!
गडगडाट तो मृदुंग
विज प्रकाशे लकाका
माऊलीच्या पालखीची
जशी झळके पताका...!
आषाढसरींमध्ये माऊलींचा पालखी सोहळा अनुभवणं ही बातच काही और आहे... वैष्णवांचा देव असलेला विष्णूही निळा आणि आषाढात बरसणारा पाऊसही निळा... विठूमाऊलीच्या जयघोषात टाळ मृदुंगांचा गजर आणि त्याच्या जोडीला आषाढात गर्जणाऱ्या मेघांचा मल्हार... एका बाजूला उधाण वाऱ्यानं धरलेला फेर, तर दुसरीकडे माऊलींच्या पालखीत वारकऱ्यांनी धरलेलं रिंगण.... पंढरीच्या दिशेनं पावलं चालत राहतात, भगव्या पताक्यांनी निळं आभाळ भरून जातं.. रंगांमधल्या समरसतेची प्रचिती देणारा हा आषाढ आणि त्याची साक्षात अनुभूती देणारा आषाढी वारीचा सोहळा.... नारायण सुमंतांसारख्या पंढरपूर परिसरातूनच लिहिता झालेल्या कवीला हे आषाढपण भावलं नाही तरच नवल.. सुमंत त्यांच्या आणखी एका कवितेत लिहितात...
थेंब आभाळी ना येतो
पूर भीमेसी ना येतो
तोच पंढरीचा काळा
माझ्या घामामंदी न्हातो...
अवघी सृष्टी पंढरी झाल्याचा हा दिव्य अनुभव... सुमंतांची ही काव्यानुभूती थेट संत सावता माळ्याशी नाळ जोडणारी आहे. `कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी`, असं म्हणणारे सावता माळी हेदेखील त्या अर्थी निसर्गकवीच म्हटले पाहिजेत... निसर्ग आणि अध्यात्म यांचा अनोखा मिलाफ आषाढात प्रकर्षानं प्रत्ययाला येतो. उन्हानं रापलेल्या काळ्या मातीला हिरवी झळाळी मिळते ती आषाढात... पुंडलिकाला भेटण्यासाठी जसा परब्रह्म आला तसाच पाऊसही धरेला भेटतो... जसा विठूमाऊलीचा अभंग आषाढात बहरतो, तसंच, धरेच्या ओटीपोटातून सृजनाचं हिरवं गाणं अंकुरतं.. शिवाराची वाटही मग पंढरीची वाटू लागते. नांगरणी झालेलं शिवार पेरतं होतं. पाटाच्या पाण्यात आषाढसरींचे थेंब असे मिसळतात की जशी चंद्रभागाच शिवारातून खळाळतं जाते... आषाढसरींचा हा सोहळा पदोपदी विठूरायाची आठवण करून देतो आणि जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी मग माहेराची सय ताजी होते...
- दुर्गेश सोनार ( २३ जून २००९ )

Thursday, 23 April 2009

...... उथळाचे श्रम वाया जाय !

बऱ्याच दिवसांनी आज लिहितोय. याचा अर्थ लिहिण्यासाठी अजिबात विषयच नव्हते, असा मुळीच नव्हे... थोडासा कंटाळा, काहीसा कामाचा ताण यामुळे लिहिण्यासाठी हवा तसा वेळ मिळत नव्हता. आता यावर तुम्ही म्हणाल आवड असली की सवड नक्की मिळते. हे शंभर टक्के मान्य आहे. पण, तशी वस्तुस्थिती प्रत्येक वेळी असतेच असं नाही. विषय कितीही डोक्यात घोळत असले तरी त्याला कागदावर मूर्त रुप देण्यासाठी काही तरी वेळ द्यायलाच हवा नां...! मनात आले आणि लिहून मोकळा झालो, इतकं सहज सोपं नसतं नां लिहिणं... बियाणं पेरलं म्हणून लगेच ते थोडंच उगवून येतं...? त्यासाठी जमिनीची मशागत करावी लागते, त्याची नांगरणी करावी लागते, थोडं खतपाणी करावं लागतं, आणि एवढं सगळं झालं की, ते बियाणं जोमानं उगवून यावं यासाठी सर्जनाचा पाऊस यावा लागतो. तर आणि तरच ते बियाणं जोरकसपणे उगवून येऊ शकतं... संत तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी म्हटलं होतं – खोल ओली पडे ते पिक उत्तम उथळाचे श्रम वाया जाय... ज्या पिकाची खोली उत्तम आहे, तेच पिक सकस उत्तम असतं... वर वर असलेलं उथळ असलेलं पिक वादळवाऱ्यात तग धरू शकत नाही. आणि हल्ली तर आजूबाजूला अशी वरवरची झुडुपं मोठ्या डौलात बहरताना दिसतात.. ही झुडुपं म्हणजेच खरेखुरे वटवृक्ष आहेत की काय असे वाटावे, अशी परिस्थिती मुद्दामहून निर्माण केली जाते. आपल्यालाही हेच मृगजळ खरे वाटायला लागते. ज्याच्याकडे मायेची सावली मागायला जावं, ते डेरेदार वृक्ष नाहीत तर फुटकळ झुडपं आहेत, हे समजेपर्यंत आपण परिस्थितीच्या उन्हात अगदी करपून गेलेले असतो. मोठी सावली देण्याचा आव आणणारी ही तथाकथित झाडं खरं तर बोन्सायच असतात. विशिष्ट विचारधारेला कवटाळून बसत आपल्याला सोयीचे तत्वज्ञान जगाला सांगणारी ही झाडं खुंटलेलीच असतात. त्यांची वाढ विशिष्ट चौकटीच्या पलिकडे होऊच शकत नाही. कारण अगदी स्पष्ट असतं. त्यांच्या मुळाशी एका विशिष्ट विचारधारेच्या तारेनं घट्ट बांधून ठेवलेलं असतं. आणि एकदा का ही विचारांची चौकट घट्ट पक्की झाली की, मग प्रत्येक प्रसंगाकडे हे लोक त्याच चौकटीच्या परिमाणातून पाहू लागतात. नदीच्या एकाच काठावर बसून ही मंडळी नदीच्या संपूर्ण भोवतालाचा अंदाज बांधू लागतात. त्यासाठी नदीच्या दुसऱ्या काठावर पण काही तरी आहे, तिथेही काही भोवताल आहे, हेच मुळी ते विसरून जातात. असो, तर अशी ही परिस्थिती असताना, लिहिण्यासाठी अजिबातच विषय नाही असे होणंच शक्य नाही... पण, लिहिण्यासाठी आवश्यक असणारी अंतःप्रेरणा जागृत करणारी परिस्थिती आजूबाजूला असते का, हे पाहावं लागतं. तरच नवं काही तरी लिहिलं जाऊ शकतं... अगदीच निराश व्हावं असं वातावरण असलं तरी त्यातही काही आश्वासक सूर आहेतच. ते गाते राहावेत, ते जुळून यावेत, यासाठी तरी आपले हात लिहिते राहावेत, नाही का ?

-          दुर्गेश सोनार 

Tuesday, 24 February 2009

शंख, मासा आणि सोमनाथदांचा वैताग...!

भाजपनं यंदा लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधानपदी बसवायचंच असा चंग बांधलाय. त्यासाठी मुंबईत अडवाणींचा जाहीर सत्कार झाला. अकरा कोटी पन्नास लाख रुपयांचा निधीही त्यांना देण्यात आला. पण, यात एक गंमत झाली. हा परिस्थितीजन्य विनोद म्हणा किंवा नियतीनं दिलेले संकेत म्हणा... काहीही म्हणा, पण, या कार्यक्रमात लालकृष्ण अडवाणी यांचे शंख वाजवण्याचे प्रयत्न व्यर्थ ठरले. एरवी सत्ताधारी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या विरोधात शंख करण्यात अडवाणींचा हात कुणी धरत नाही. पण, खरोखरचा शंख वाजवायची जेव्हा वेळ आली तेव्हा अडवाणी यांची हवा थोडी कमीच पडली. दोनतीनदा शंख वाजवण्याचा आटापिटा अडवाणींनी केला खरा... पण, शंख अजिबातच वाजत नाही हे लक्षात येताच त्यांनी तो बाजूला केला. त्यामुळेच लाल'कृष्णाचा शंख न वाजण्याचा झालेला हा (अप)शकुन भाजपला काय फळ देणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच... ( पण, म्हणून काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांनी आताच हुरळून जाऊन चालणार नाही. कारण याच सभेत अडवाणींनी आपल्या शब्दांचा शंखनाद चांगलाच केलाय. )

******

निवडणुका आता जवळ आल्यात, हे सांगायला आता कुणा ज्योतिषाची गरज नाही. सगळ्याच राजकीय पक्षांचे नेते आपल्या भाषणांमधून, जाहीर सभांमधून त्याचा डंका पिटू लागलेत. या जाहीर सभांमधून होणारी भाषणं मुळातूनच ऐकण्यासारखी असतात. आपल्या प्रतिस्पर्धी पक्षाच्या नेत्यांना शाब्दिक बाणांनी कसे घायाळ करता येईल, याची हरेक संधी प्रत्येक नेते शोधत असतात.  त्यासाठी वाट्टेल त्या उपमा द्यायलाही हे नेते मागेपुढे बघत नाहीत. आता नरेंद्र मोदींचंच उदाहरण घ्या नां... परवा ते गोव्यात गेले होते. तिथल्या एका सभेत त्यांनी काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांना लक्ष्य केलं. राहुल गांधी हा शोभेचा मासा आहे, अशा शब्दांत मोदींनी त्यांची खिल्ली उडवली. काँग्रेसमधले नेते हे संरक्षित वातावरणात मजेत वावरणारे शोभेचे मासे आहेत आणि भाजपमधले नेते म्हणजे महासागरात आव्हानांच्या लाटा झेलणारे मासे आहेत, अशी मत्स्यतुलना मोदींनी केली. गोव्यात आल्यानंतर माशांशिवाय दुसरी कुठली उपमा सुचणार, नाही का ? असो... हे झालं मोदींचं कवित्व... पण, काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनाही प्रत्युत्तर देण्याची खुमखुमी आली आणि मोदींच्याच उपमेचा आधार घेत त्यांनी पलटवार केला. मोदी म्हणजे माणसे खाणारा पिरान्हा जातीचा मासा आहे, अशी उलट टीका तिवारीबाबूंनी केली. तर असं हे आरोप प्रत्यारोपांचं मत्स्यपुराण...

******

संसदेचं या टर्ममधलं शेवटचं अधिवेशनही अंतिम टप्प्यात आलंय. या अधिवेशनातही खासदारांनी आपली गोंधळाची परंपरा कायम ठेवली. त्यामुळे खासदारांचे हेडमास्टर असलेले सोमनाथदा चांगलेच वैतागले. अरे, तुम्ही असे वागता,  तुम्हाला पुन्हा कुणी निवडून तरी देईल का ?’ असं सोमनाथदांनी खासदारांना बजावलं देखील... पण, पुन्हा हे काही सुधारणार नाहीत, हे लक्षात येताच त्यांनी सगळ्या खासदारांना निवडून येण्याच्या शुभेच्छा देत कानात बोळे घालून घेतले. भारतीय लोकशाही साठीकडे झुकली असतानाच आपल्या लोकप्रतिनिधींनी संसदेत केलेलं प्रदर्शन सध्याचं वास्तव सांगायला पुरेसं आहे. मतदार राजा सुजाण आहे, त्याला कोणाला उचलून धरायचं आणि कुणाला उचलून आपटायचं हे चांगलंच माहिती आहे.  त्यामुळेच बा, मतदारराजा ! जागा राहा, आणि सत्तांधांना त्यांची जागा दाखव रे बाबा....!

******

-         दुर्गेश सोनार ( २४  फेब्रुवारी २००९ )

 

Thursday, 5 February 2009

चिरेबंदी बांधलेलं, असं तुझं गाव खोटं...!

मोरोपंत सकाळपासूनच अस्वस्थ होते. ज्यांना कधी एकही ओळ धड लिहिता आली नाही, त्यांनी कवितांचे व्याकरण शिकवावे म्हणजे काय ? असा सवाल त्यांच्या मनात घोळत होता. त्याला कारणही तसंच होतं. कवितेसंबंधी नवी मुंबईत कोमसापने भरवलेल्या चर्चासत्रात काही समीक्षकांनी १९७० ते १९९० या कालावधीतल्या कविता या कविताच नाहीत, असा विसंवादी सूर लावून धरला होता. त्याची साद्यंत बातमी वाचून मोरोपंत अस्वस्थ झाले. कविवर्य ग्रेस यांची कविता असेल दुर्बोध, पण म्हणून ती कविताच नाही की काय ? असे म्हणण्याचे धारिष्ट्य हे तथाकथित समीक्षक करूच कसे शकतात ? ज्यांचे आयुष्य महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर पंचेचाळीस मिनिटांचे पाठ केलेले लेक्चर देण्यात गेले आणि वर्षानुवर्षे तोच तो अभ्यासक्रम शिकवून ज्यांच्या बुद्धीवर गंज चढला, त्यांना कविता ती कशी आकळावी ? हे परंपरागत चौकटीत अडकलेले आणि एकाच ठिकाणी बसून बसून बौद्धीक बद्धकोष्ठ झालेले समीक्षक छातीठोकपणे सांगतात की, १९७० ते १९९० या काळातल्या कवितेतून सामाजिक अभिव्यक्ती झालीच नाही. या काळातले कवी रोमँटीसिझममध्येच अडकले. असल्या या समीक्षकी बाण्यामुळे मोरोपंत कमालीचे व्यथित झालेले... त्यांनी तडक आपल्या बुकशेल्फातून ग्रेसच्या संध्याकाळच्या कविता काढल्या. एकेक कविता वाचत गेले...  शुभ्र अस्थींच्या धुक्यात, खोल दिठींतली वेणा... निळ्या आकाशरेषेत, जळे भगवी वासना...  , अंधार असा घनभारी, चंद्रातून चंद्र बुडाले... स्मरणाचा उत्सव जागुन, जणुं दुःख घराला आले.... गुतंवता मिठी, गर्द झाले श्वास, सुजले आकाश पाठीवरी... अशा रंगापाशी, मातीचे चांदणे, अल्याडचे जिणे, जन्माआधी...  पाऊस कधीचा पडतो,  झाडांची हलती पाने, हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सूराने.... घरांनी आपली दारे बंद केलेली असतात, डोळ्यांना वेढून बसलेल्या अस्तित्वांच्या रांगाही निवून जातात... तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुझे केस पाठीवरी मोकळे, इथे दाट छायांतुनी रंग गळतात, या वृक्षमाळेतले सावळे... या आणि या सारख्या कितीतरी कविता मोरोपंत वाचत गेले... एवढी समृद्ध शब्दकळा आणि त्यातून उलगडत जाणारे अर्थांचे अनेकांगी पदर... नित्य नूतन भासिजे... त्याप्रमाणे ग्रेस यांच्या कवितांमधून व्यक्त होत जाणाऱ्या अर्थांच्या लडी... त्यांनी वापरलेले शब्द दुर्बोध आणि बोजड आहेत, हे निःसंशय... पण, म्हणून त्याचा अर्थ माहिती करून घेण्याचा प्रयत्नच न करता, त्यांच्यावर सरसकट कविताच नाहीत त्या फक्त कवितांचा आभास निर्माण करतात, असं म्हणणं म्हणजे शुद्ध वेडगळपणा आहे. असं विधान करणाऱ्या समीक्षकांची मराठीची जाणच मुळातून तपासली पाहिजे. प्रतिमा आणि प्रतिकांमधून व्यक्त होणारी कविची प्रतिभा एखादा समीक्षक नाकारूच कसा शकतो ? बरं ग्रेस यांच्याबाबत बोलणं टाळलं, तरी याच वीस वर्षांत मंगेश पाडगावकरांचा आलेला सलाम या कवितासंग्रह विसरून कसे चालेल ? पाडगावकरांची सलाम ही कविता सामाजिक अभिव्यक्ती करत नाही, त्यात फक्त रोमँटीसिझम आहे, असा निष्कर्ष काढणं कुणाला तरी पटेल का ? एकूणच भाषण म्हणजे नुसता वारा... असा समज त्या बोलघेवड्या समीक्षकांचा असावा... सत्तर ते नव्वदच्या वीस वर्षांत ग्रेस पाडगावकरांबरोबरच वसंत बापट, विंदा करंदीकर ही कवित्रयी फुल फॉर्मातच होती. माझे विद्यापीठमधून कवितेतून सामाजिक वास्तवाकडे लक्ष वेधणारे नारायण सुर्वे यांचेही सनदसारखे कवितासंग्रह या काळात प्रकाशित झाले आहेत नां ? सुर्व्यांच्या कविता रोमँटिसिझममध्ये अडकल्या आहेत काय ? त्यांना सामाजिक परिमाण नाही काय ? नारायण कुलकर्णी कवठेकर यांची कविता असेल किंवा यशवंत मनोहरांचा उत्थानगुंफा सारखा कवितासंग्रह असेल... केशव मेश्राम यांच्यासारखे दलित जाणिवांतून लिहिणारे कवीही याच काळात पूर्ण भरात होते. त्यांची संवेदना ही सामाजिक संवेदना नाही काय ? नामदेव ढसाळ यांची गोलपीठामधून व्यक्त होणारी सामाजिक अभिव्यक्ती ही या झापडबंद समीक्षकांना दिसली नाही काय ? विठ्ठल वाघ यांच्याही वृक्षसूक्त, काळ्या मातीत माती मधून प्रतीत होणाऱ्या संवेदना या रोमँटिक आहेत काय ? ना.धों. महानोर यांच्या रानातल्या कवितांनंतर ग्रामीण भागातून लिहू लागलेली एक समृद्ध पिढीच मराठीला कवितेला मिळाली. त्यांच्या ग्रामीण संवेदना या काय सामाजिक प्रतिबिंब मांडणाऱ्या नव्हत्या ? यात इंद्रजीत भालेराव, नारायण सुमंत, प्रकाश घोडके, प्रकाश होळकर अशी कितीतरी नावं सांगता येतील... आता आघाडीचे कवी म्हणून यांची नाव घेतली जातात. पण, या सगळ्या कविंचा मशागतीचा काळ हा याच वीस वर्षांतला आहे, हे विसरून कसे चालेल. काट्याकुट्याचा तुडवित रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता अशी ग्रामीण वेदनेची कविता लिहिणाऱ्या इंद्रजीत भालेराव यांच्या कवितांना सामाजिकतेचे भान नाही ? नारायण सुमंत यांची वरकरणी मंचीय वाटणारी पण, तितकीच आत डोकवायला लावणारी ग्रामीण मराठी कविता ही सर्वार्थाने सामाजिकच आहे. प्रकाश घोडके यांच्या कवितांमध्ये तर दलित जाणिवांचा एक अंतःस्थ सूर नक्कीच जाणवतो.  आभाळ झडतं, आभाळ झडतं गं, उपाशी पोटी पाण्याच्या घोटी, सपान पडतं गं... चिरेबंदी बांधलेलं, असं तुझं गाव खोटं, वेशीपाशी आलो, अन् बंद झाली वहिवाट, काळजाच्या आत कुठं मन रडतं गं, आभाळ झडतं गं...  प्रकाश घोडकेंच्या या कवितेतून व्यक्त झालेली नाकारले गेल्याची वेदना विद्यापीठीय समीक्षकांना कधी कळणार ?  बुकशेल्फातली अशी एक ना अनेक कवितांची पुस्तकं, त्यातल्या एकेक कविता आणि त्यातून रंगत गेलेली सामाजिक संवेदनांची मैफिल मोरोपंताच्या मनात रंगत गेली. मूठभर समीक्षकांच्या असल्या विद्यापीठीय निकषांमुळे चांगल्या कवितांची वहिवाट अशी वेशीपाशी बंद झाल्याचं पाहून मोरोपंतांचं मनही असंच काळजाच्या आत कुठं रडत राहिलं आणि मनाच्या आत दडलेलं आभाळही झडत राहिलं....!

-         दुर्गेश सोनार ( दिनांक ५ फेब्रुवारी २००९ )

Thursday, 29 January 2009

तोल सावरताना....!

सकाळी ऑफिसला जायला निघालो. सोसायटीच्या बाहेरच डोंबा-याचा खेळ सुरू होता. दोन बाजूला काठ्या उभारलेल्या... त्याला एक दोरी बांधलेली आणि त्यावर सात आठ वर्षांची चिमुरडी डोक्यावर हंड्याची उतरंड घेऊन काठीने तोल सांभाळत कसरत करत होती. तिच्या साथीला होता ढोलकीचा ताल.. कळकट कपड्यात फाटलेला संसार शिवण्यासाठी जगण्याचा संघर्ष करणारा तो डोंबारी... फाटकी लुंगी, मळलेला सदरा आणि गळ्यात अडकवलेला ढोलक, असा त्याचा अवतार... पोटाची खळगी भरण्यासाठी आपलाही हातभार देणारी ती चिमुरडी... काठीने तोल सावरणारी ती चिमुरडी स्वतःबरोबरच आपल्या कुटुंबाचाही तोल सांभाळत होती. काय असेल तिचं भविष्य..?  मनात विचार आला, असे किती पैसे त्याला मिळत असतील, अशी कसरत करून ?  पण, पोटासाठी ही रोजची कसरत त्यांना करावी तर लागणारच... आपण नाही का करत अशी कसरत... ? करतो, जरूर करतो... पण, त्यात फरक असतो जमीन अस्मानाचा.... 'घरोघरी मातीच्या चुली' अशी मराठीत म्हण आहे. त्याचा प्रत्यय आपल्याला पदोपदी असा येत असतो. समस्या, दुःखं, प्रत्येक माणसाची सारखीच असतात... फक्त त्याचं स्वरुप आणि परिस्थिती वेगवेगळी असते. आपणही खरे तर डोंबारीच असतो... पांढरपेशी डोंबारी...  व्यवस्था नावाचा ढोलक आपल्याला नाचवत असतो आणि आपणही जगण्याची कसरत करत असतो. दोन बाजूंच्या काठ्यांना बांधलेला दोर आणि त्यावरून चालताना पडू नये म्हणून करावी लागणारी खटपट... सरावानं हे शक्य होत असलं तरी त्यासाठी परिश्रम करावे तर लागतातच नां... ? आपणही असेच हळूहळू सरावतो... आणि आपल्याही नकळत पट्टीचे डोंबारी होऊन जातो... रस्त्याने जाताना आजूबाजूला असे अनेक डोंबारी दिसतात, काही सडलेले, काही पडलेले, तर काही चिवटपणे तोलून उभे राहिलेले....

ऑफिसात आलो... सवयीप्रमाणे ई मेल चेक केले. एका बालमित्राचा अनपेक्षित मेल इनबॉक्समध्ये येऊन पडला होता. उत्सुकतेने मी तो वाचला. नोकरीच्या निमित्ताने परदेशात गेलेला तो मित्र वैतागला होता. मंदीमुळे त्याच्या नोकरीवर संक्रांत आलेली... कुठल्याही क्षणी गाशा गुंडाळून भारतात परतावं लागणार या विचारानं तो हतबल झालेला... त्याच्या शब्दांशब्दांतून ते प्रतीत होत होतं. भल्यामोठ्या पगाराच्या नोकरीतही त्याला स्वास्थ्य नव्हतं. तो त्याचा तोल सावरू शकत नव्हता. आत्मविश्वास ढळलेला तो माझा मित्र केविलवाणा होऊन तिथलं मंदीचं वास्तव सांगत होता... माझ्या डोळ्यांसमोर पुन्हा तो सकाळचा डोंबारी आणि दोरीवर तोल सावरत चालणारी ती चिमुरडी आली.... तोल सावरण्याचं त्यांचं कसब पाहून खरंच अप्रूप वाटलं... एकीकडे मंदीच्या फटक्यामुळे तोल न सावरू शकणारा माझा परदेशातला मित्र तर दुस-या बाजूला परिस्थितीचा हसतमुखाने स्वीकार करत जगणं तोलून धरणारी ती चिमुरडी.... तोल राखायला शिकवणारे हे प्रसंग माझ्यासाठी तितकेच तोलामोलाचे वाटले.

-          दुर्गेश सोनार (दिनांक, २९ जानेवारी २००९)

Monday, 26 January 2009

माझा प्रजासत्ताक...

नेहमीपेक्षा आज जरा लवकरच उठणं झालं ते सोसायटीत मोठ्याने लागलेल्या गाण्यांमुळे... अगदी सक्काळी सक्काळी `ऐ मेरे वतन लोगो`चे सूर कानी पडले... आणि झोपी गेलेला जागा झाला...! झोपलेल्या प्रत्येकाला जागं करणं हे आपलं परमकर्तव्य आहे, या सद्भावनेनंच जणू काही आमच्या सोसायटीतल्या कार्यकर्त्यांनी हे गाणं मोठ्या आवाजात लावलं असावं, असा समज होऊन अस्मादिकांचं उठणं झालं... असो, निमित्त काही का असेना वर्षातून असं दोनदा या गाण्याची आठवण होते आणि तमाम भारतीयांना शहिदांनी केलेल्या बलिदानाची आठवण करून दिल्याचं समाधान असं सोसायटी सोसायटीतल्या प्रत्येक देशभक्त कार्यकर्त्याला लाभतं.... तर आमच्या प्रजासत्ताकाची सुरूवात झाली ती `याद करो कुर्बानी`च्या अमीट सुरांनी.... त्याच्या जोडीला देशभक्तीपर गाणी गाण्यासाठीच जन्मलेल्या महेंद्र कपूरांच्या आवाजातली गाणीही होतीच... अधूनमधून ऑस्कर नॉमिनी रेहमानभाऊंचं `माँ तुझे सलाम` होतंच... अशा स्वरमिलाफात प्रजासत्ताक दिनाची सुरूवात म्हणजे अहाहा....! या गाण्यांच्या पार्श्वसंगीतावर आमच्या चित्तवृत्ती जाग्या झाल्या. लाल किल्ल्यापासून ते देशभरातल्या शाळा कॉलेजं, सरकारी ऑफिसांमध्ये तिरंगा अभिमानानं लहरत असल्याचं सुखद चित्र डोळ्यांसमोर तरळू लागलं... तशी स्वप्नं पाहायची आमच्या डोळ्यांची सवय फार जुनी आहे. अहो मीच काय, आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूही स्वप्नं पाहायचे... म्हणूनच तर स्वातंत्र्याची पहाट होत असताना त्यांनी भारतीयांना एक स्वप्न दाखवलं होतं. फार वर्षांपूर्वी आम्ही नियतीशी एक करार केला होता. त्यानुसार वागण्याची वेळ आज येऊन ठेपली आहे, असं नेहरू म्हणाले होते... `जन गण मन` लिहिणारे गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांनीही स्वातंत्र्याच्या नंदनवनाचं स्वप्न पाहिलं होतं. स्वप्नातल्या स्वातंत्र्याच्या नंदनवनात `देश सदैव जागा राहो`, अशी प्रार्थनाही त्यांनी केली होती... माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनीही भारत जागतिक महासत्ता होण्याचं स्वप्न पाहिलं आणि भारतीयांना दाखवलंही... तर अशी ही देशविकासाची स्वप्नं... आम्हीही अशी स्वप्नं पाहतो... पण, सकाळ झाली की, ती विरून जातात... स्वप्नं पडायची असतील, तर त्यासाठी गाढ झोपलं पाहिजे.... पण, असं सुखानं कोण झोपू देतं ? आता तर न्यूज चॅनेल्सनी सगळ्यांची  अक्षरशः झोपच उडवून टाकली आहे... त्याच्यावर तोडगा म्हणून आता सगळे न्यूज चॅनेल्स हे मनोरंजन वाहिन्या म्हणून घोषित करा, अशी मागणी जोर धरत असल्याची चर्चा आहे. म्हणजे कसं, जसा सासू सुनांचा डेली सोप, तसाच चोवीस तास बातम्यांचा रिऍलिटी (वास्तव की अवास्तव ?) शो..! घटनाकारांनी प्रत्येक भारतीयाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य दिलं, त्यावेळी त्यांनाही या मूलभूत हक्कांचा भविष्यात असा वापर होईल, असं वाटलं नसेल... किंबहुना त्यांना स्वप्नातही असं वाटलं नसेल...

तर देशभक्तीच्या गाण्यांनी आम्ही नुसतेच जागे झालो नाही तर स्वप्नातून वास्तवातही आलो. वर्तमानपत्रांतून छापून आलेलं कालचं वर्तमान वाचत वाचत आपण खरेच `लोकसत्ता`क झाल्याच्या अभिमानानं ऊर भरून आला. अतिरेकी हल्ल्यात वीरमरण आलेल्या शहिदांना मरणोत्तर जाहीर झालेले बहुमान, पद्म पुरस्कारांची भलीमोठी यादी, त्या यादीतून बिटविन दी लाईन्स व्यक्त होणारे कुणाकुणाचे हितसंबंध... प्रजासत्ताक चिरायु होवो, असं म्हणत स्वतःचं मार्केटिंग करणा-या पान पान जाहिराती... देश मोठा की, ब्रँड असा भ्रम कुणालाही होईल, अशा या जाहिराती... इतक्या जाहिराती मिळाल्यानंतर कोणताही वृत्तपत्र मालक एखाद दिवस आपल्या कर्मचा-यांना सहजपणे सुटी देऊ शकतो नाही का... २६ जानेवारीची सुटी असल्याने उद्याचा अंक प्रकाशित होणार नाही, ही चौकट म्हणूनच पान एकच्या उपसंपादकानं समाधानानं पानात लावली असेल... तेव्हा समस्त वृतपत्रसृष्टीचा प्रजासत्ताक आनंदात साजरा होणार असं मनात म्हणत आमची स्वारी तयार झाली. आम्ही प्रिंटचे पत्रकार नसल्यानं आम्हाला कुठली प्रजासत्ताकाची सुट्टी आणि कसलं काय ?

एकूणच २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दोन राष्ट्रीय सणांचा थाटच काही और असतो. चौकाचौकातून देशभक्तीची गाणी, रांगोळ्या, ठिकठिकाणी शहिदांच्या आठवणी जागवणारे कार्यक्रम, परिटघडीच्या गणवेशात नटूनथटून शाळेला निघालेली भारताची उद्याची पिढी... शाळांच्या मैदानावर होणारे संचलन... देशप्रेमाचं भरतं यावं, असं हे वातावरण... नसानसांतून मग रक्त उसळू लागतं.. देशासाठी काहीतरी करावं, असं वाटू लागतं.... देशासाठी आपण देणं लागतो, असे भलेथोर विचार मनात येऊ लागतात... पण, दिवस संपला की, हे विचारही कुठल्या कुठे पसार होतात... भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावर छापलेली प्रतिज्ञा विस्मरणात जाते... `मला काय त्याचे ?`  ही भावना बळावते. लोकलमधून जाताना प्रजासत्ताक भारताचं खरंखुरं वास्तव स्टेशनगणिक समोर येतं. पण, त्यावर काही व्यक्त होण्याइतकी संवेदना आमच्यात कुठे राहिलीय? जी अवस्था मुंबईची, तीच किंबहुना त्याहीपेक्षा दयनीय अवस्था ग्रामीण भारताची आहे. स्वतंत्र, सक्षम, बलशाली भारताचं स्वप्न लोडशेडिंगच्या अंधारात हरवून गेलीयत... एका बाजूला मोठमोठे फूड फेस्टीवल साजरे होतात, तर दुस-या बाजूला अनेकांना एका वेळचं अन्नही पोटभर मिळत नाही. प्रत्येक गोष्ट साजरी करायची सवय लागलेले आपण सो कॉल्ड पांढरपेशे २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट हे दिवसही त्याच पद्धतीनं साजरे करतो आहोत... असे भपकेबाज कार्यक्रम करताना प्रजासत्ताक भारताचं हे वास्तव सोयिस्करपणे विसरलं जातंय. साठीत बुद्धी नाठी होते असं म्हणतात.. प्रजासत्ताकाची साठी साजरी करत असताना भारतीयांची बुद्धी नाठी होऊ नये, इतकीच अपेक्षा...   

-          दुर्गेश सोनार (दिनांक २६ जानेवारी २००९)

Friday, 16 January 2009

गौरव ‘हिरव्या जगाचा....!’



ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद यादव यांची ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची बातमी कळली आणि ग्रामीण साहित्याचं हिरवं जग अधिकच बहरून आल्यासारखं वाटलं. त्याचं कारणही तसंच आहे. पंढरपूरसारख्या अर्धशहरी आणि बहुतांशी ग्रामीण चेहरा असणा-या गावातून लिहू लागलेल्या मुलांसाठी डॉ. आनंद यादव हे प्रेरणास्थानच आहेत. माझं नशीबही बलवत्तर आहे. यादव सरांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मला खूपदा मिळाली. गंमत म्हणजे डॉ. आनंद यादव यांनी प्राध्यापकीला ज्या ठिकाणाहून सुरूवात केली त्या रयत शिक्षण संस्थेच्या पंढरपूर कॉलेजचा (आताचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय) मी विद्यार्थी... मी बारावीत असताना आमच्या वाङ्मय मंडळाचं उद्घाटन डॉ. आनंद यादव यांनी केलं होतं. त्यावेळी त्यांना सर्वप्रथम भेटण्याचा योग आला. तोपर्यंत त्यांचं झोंबी हे आत्मकथन वाचलं होतं. शिक्षणाच्या ओढीनं घर सोडून पळून गेलेल्या आनंदाचा डॉ. आनंद यादव कसा होतो, याचं वास्तवदर्शी चित्रण झोंबीत वाचायला मिळतं. त्यामुळेच झोंबी लिहिणा-या या लेखकाला जवळून भेटण्याची उत्सुकता नक्कीच होती. पंढरपुरातले ज्येष्ठ साहित्यिक आणि यादव सरांचे जवळचे स्नेही डॉ. द. ता. भोसले यांनी माझी ओळख करून दिली. कवितेत नव्यानेच काहीतरी करू पाहणा-या माझी यादव सरांनी आस्थेनं केलेली विचारपूस आणि त्याचवेळी लिहित राहा हे सांगताना वडिलकीच्या नात्याने केलेला उपदेश माझ्या अजूनही स्मरणात आहे. त्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा पंढरपुरात सुरू झाली. त्याच्या उद्घाटन कार्यक्रमालाही यादव सर आले होते. त्यावेळी झाली ती दुसरी भेट.. ही भेट आमची ओळख आणखी पक्की करून गेली.

त्यानंतर मी उच्च शिक्षणाच्या निमित्तानं पुण्यात आलो. त्यावेळी यादव सरांच्या घरी जाऊन त्यांच्याशी गप्पा मारण्याची संधी मिळाली. यावेळी निमित्त ठरलं प्रतिभा संगम या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या साहित्य संमेलनाचं... सांगलीत प्रतिभा संगम व्हायचं होतं. त्याचा मी निमंत्रक होतो आणि यादव सरांनी उद्घाटक म्हणून यावं हा प्रतिभा संगमच्या संयोजक मंडळींचा आग्रह होता. यादव सरांनी कोणतेही आढेवेढे न घेता होकार दिला. या भेटीत यादव सरांमधला सच्चा माणूस अधिक जवळून अनुभवता आला. मराठी साहित्यात अमूल्य योगदान दिलेल्या या लेखकाशी आपण इतकं जवळून बोलतो, हेच माझ्यासाठी खूप कौतुकाचं होतं.

यादव सरांची ग्रामीण भागाशी असलेली नाळ पक्की आहे. पुण्यातल्या धनकवडी परिसरातल्या त्यांच्या घरी आलं की त्याची प्रकर्षानं जाणीव होते. कलानगरमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचं घर दिसतं. घराला नावही मातीशी नातं सांगणारं.. "भूमी’…! मातीशी नातं सांगणारं, मातीशी नाळ जोडलं गेलेलं आणि मातीतून फुललेलं यादव सरांच्या साहित्याचं हिरवं जग त्यांच्याच लेखनातून अनुभवण्यासारखं आहे. ग्रामीण संस्कृतीतली नेमकी स्पंदनं यादव सरांच्या आधी मराठी साहित्यात अपवादानंच पाहायला मिळतात. १९६० मध्ये एक कवी म्हणून मराठी साहित्यविश्वात यादव सरांनी पाऊल ठेवलं. कदाचित ग्रामीण संवेदना जोरकसपणे मांडण्यासाठी यादव सरांना त्यावेळी कवितेचं साधन जास्त जवळचं वाटलं असेल.. पण, त्यानंतर त्यांचा दुसरा कवितासंग्रह आला तो तब्बल अठरा वर्षांनी...! मळ्याची माती या नावाचा तो कवितासंग्रह होता आणि त्यानंतर १९८९ मध्ये म्हणजे अकरा वर्षांनी मायलेकरं हा त्यांचा तिसरा कवितासंग्रह प्रकाशित झाला. पण, यादव सरांमधल्या कवीपेक्षाही त्यांच्यातला कथाकार आणि ललित लेखक अधिक आश्वासक ठरला. यादव सरांचं वेगळेपण सगळ्यात पहिल्यांदा मराठी वाचकांसमोर आलं ते झोंबी या आत्मकथनामुळे... त्यातली सच्ची शब्दकळा आणि अनुभवांची प्रभावी मांडणी यामुळे वाचकाची पकड झोंबीनं घेतली. १९८७ साली प्रकाशित झालेल्या झोंबीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तो १९९० साली.. राज्य सरकारचाही पुरस्कारही त्यांना मिळाला.

झोंबीचाच पुढचा भाग म्हणून लोकांसमोर आलेल्या 'नांगरणी' या आत्मकथनालाही वाचकांनी डोक्यावर घेतलं. त्यानंतर घरभिंती (१९९२) आणि काचवेल (१९९७) ही दोन आत्मकथनंही यथावकाश प्रसिद्ध झाली. या सगळ्या आत्मकथनांचं सामायिक वैशिष्ट्य सांगायचं तर त्यात कुठेही आक्रस्ताळेपणा येत नाही की दुःखाचं भांडवल करण्याचा केविलवाणा प्रयत्न दिसत नाही. यादव सरांच्या आधीही आणि नंतरही अनेकांनी आत्मकथनं लिहिली आहेत. पण, त्यापैकी अनेकांच्या लेखनांत आत्मप्रौढी, दुःख, संघर्ष यांचं भांडवल करण्याचाच प्रयत्न अधिक दिसून येतो. याच काळात दलित आत्मकथनंही गाजत होती. दलितांच्या वेदना, त्यांच्या वाट्याला आलेली दुःखं, डावललेपणाची भावना, या सगळ्यांचं प्रतिबिंब तत्कालीन दलित साहित्यात उमटत होतं. पण, तरीही त्याचा परिघ हा मर्यादितच होता. त्यात सर्वंकष ग्रामसंस्कृतीचा अभाव होता. ही उणीव यादव सरांच्या लेखनानं भरून काढली. गोतावळा, एकलकोंडा या सारख्या कादंब-यातूनही याचा प्रत्यय आपल्याला येऊ शकतो. खळाळ, माळावरची मैना, डवरणी उखडलेली झाडे, झाडवाटा, उगवती मने या त्यांच्या कथासंग्रहांच्या नावातूनही त्यांची ग्रामसंस्कृतीविषयी असलेली आपुलकी आणि निष्ठा दिसून येते.

अगदी अलिकडच्या काळात त्यांनी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांची जीवनचरित्रं वेगळ्या परिप्रेक्ष्यात मांडण्याचाही प्रयत्न केलाय. लोकसखा ज्ञानेश्वर (२००५) आणि संतसूर्य तुकाराम (२००८) या चरित्रात्मक कादंब-यातूनही त्यांनी ग्रामसंस्कृतीचे उत्तम दाखले दिलेयत. कथा, कादंबरी, कविता आणि ललित या साहित्याच्या विविध प्रांतांमध्ये सहजतेने मुशाफिरी करणा-या यादव सरांना आता महाबळेश्वरमध्ये होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळणं म्हणजे ग्रामीण साहित्य संस्कृतीचाच गौरव आहे. यादव सरांच्या लेखणीने ग्रामीण साहित्याची केलेली नांगरणी इतकी पक्की आहे की त्यातून उगवत्या मनांचा गोतावळा दिवसेंदिवस वाढत जाईल आणि मातीखालच्या मातीत दडलेलं आम्हा नवोदितांचं हिरवं जग सर्वांसाठी बहरून येईल, हे निःसंशय...!   

-          दुर्गेश सोनार (दिनांक – १६ जानेवारी २००९)